बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला !

कुटुंबियांचा तृणमूल काँग्रेसवर हत्या केल्याचा आरोप

कोलकाता (बंगाल) – बंगालमध्ये पंचायत निवडणुका होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात हिंसाचार चालू आहे. २९ जून या दिवशी पश्‍चिम मेदिनीपूर येथे भाजपच्या बूथ (केंद्र) अध्यक्षाचा मृतदेह त्यांच्या घरात गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दीपक सामंत (३५ वर्षे) असे त्यांचे नाव आहे. सामंत यांच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, तृणमूल काँग्रेसचे नेते मलिक मैती आणि त्यांचे समर्थक हे सामंत यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत होते.

१. भाजपचे घाटल जिल्हाध्यक्ष तन्मय दास म्हणाले की, अलीकडेच दीपक सामंत यांच्यावर भाजपच्या विरोधात काम केल्याचा आरोप होता. त्यामुळेच त्यांना पंचायत निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्यापासून रोखण्यात आले. असे असले, तरी तृणमूल काँग्रेसचे नेते त्यांना त्रास देत होते, सामंत यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकीही देत होते.

२. दीपक सामंत यांची हत्या केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने फेटाळून लावला आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते अबू कलाम बक्स म्हणाले की, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. प्रत्येक मृत्यूचे राजकारण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तो गिधाडाप्रमाणे मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करतो. पोलीस अधिकारी या प्रकरणाचे अन्वेषण करत असून लवकरच सत्य बाहेर येईल.

संपादकीय भूमिका

  • तृणमूल काँग्रेस सरकार विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करणे, हाच बंगालमधील या घटनांवरील एकमेव उपाय होय !
  • बंगालमध्ये सातत्याने भाजपच्या कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या हत्यांवर देशातील लोकशाहीप्रेमी राजकीय पक्ष मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !
  • अशा हत्या अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भाजप सरकारच्या राज्यांत झाल्या असत्या, तर एव्हाना अन्य पक्षांनी आकाशपाताळ एक केले असते !