उत्तरप्रदेशमध्ये यंदा कुठेही ईदचे नमाजपठण रस्त्यावर झाले नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यात ईदचे नमाजपठण केले जात आहे; मात्र राज्यात कुठेही रस्ता बंद करून नमाजपठण करण्यात आलेले नाही. वाहतूक रोखण्यात आलेली नाही. याचे कारण राज्यात कायद्याचे राज्य आहे आणि ते सर्वांसाठी समान आहे, असे विधान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २२ एप्रिल या दिवशी एका कार्यक्रमात केले. २२ एप्रिल या दिवशी रमझान ईद होती. एरव्ही देशात सहस्रो ठिकाणी ईद आणि शुक्रवारच्या दुपारच्या नमाजाच्या वेळी रस्ता बंद करून नमाजपठण केले जाते; मात्र उत्तरप्रदेशमध्ये ते २२ एप्रिल या दिवशी झाले नाही.

एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितले की, राज्यातील ३१ सहस्र ८३८ ठिकाणी शांततेत ईदचे नमाजपठण झाले. यासाठी योग्य नियोजन आणि प्रयत्न यांमुळेच कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

उत्तरप्रदेशात प्रत्येक सण उत्सव म्हणून साजरा होत आहे !

योगी आदित्यनाथ या वेळी म्हणाले की, आझमगड या जिल्ह्याच्या नावालाही लोक घाबरत होते. आज तेथे द्रुतगती महामार्ग झाले आहेत. तेथे विमानतळ आणि विश्‍वविद्यालही होत आहे. आता कुणाला आझमगडची भीती वाटत नाही. भीतीचे रूपांतर उत्सवामध्ये झाले आहे. अयोध्येत दीपोत्सव साजरा होतो. काशीमध्ये देवदीपावली साजरी होते. प्रयागराज कुंभ आणि माघ मेळे यांसाठी ओळखला जातो. वृंदावन रंगोत्सवसाठी ओळखले जात आहे. राज्यात आता प्रत्येक सण उत्सव म्हणून साजरा होत आहे.

संपादकीय भूमिका

  • जर असे उत्तरप्रदेशात शक्य आहे, तर संपूर्ण देशात का नाही ? असे करण्यास अन्य राज्यांना काय अडचण आहे ? कि सर्वत्र योगी आदित्यनाथ यांच्यासारखेच मुख्यमंत्री असल्यावर हे साध्य होऊ शकते ?