मुंबई-गोवा महामार्गावर हातिवले (राजापूर) येथील टोलवसुली चालू

स्थानिकांना टोलमधून ७० टक्के सूट

रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना आता प्रवासासाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. राजापूर तालुक्यातील हातिवले हा ‘टोलनाका’ चालू करण्यात आला असून ११ एप्रिलपासूनच टोलवसुली चालू करण्यात आली आहे. स्थानिकांना मात्र या टोलमधून ७० टक्के सूट देण्यात आली आहे. दरम्यान या महामार्गाचे उर्वरित २० किलोमीटरच्या अंतराचे काम अद्याप पूर्ण व्हायचे आहे. सध्या ५६ किलोमीटरचे बांधकाम झाले आह, त्याचीच टोल आकारणी केली जात असल्याचे टोल प्रशासनाने म्हटले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याचे काम अपूर्ण असतांनाही हातिवले येथील चालू झालेली टोलवसुली २२ डिसेंबरला स्थानिकांनी विरोध करून बंद पाडली होती. भाजपचे नेते माजी खासदार नीलेश राणे यांनीही ‘जोपर्यंत महामार्ग पूर्ण होत नाही, तोपर्यंत टोलवसुली केली जाऊ दिली जाणार नाही, अशी चेतावणी त्या वेळी प्रशासनाला दिली होती.