अंमळनेर (जिल्हा जळगाव) येथे दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू केल्यावर आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव !

‘दैनिकाचे वितरण वाढण्याच्या संदर्भात जळगाव येथे एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी सर्वांना समष्टी ध्येय घेण्यास सांगितले होते. तेव्हा अंमळनेर तालुक्यातही दैनिक चालू करण्याचे ध्येय ठरवले. त्यानुसार नियोजन करण्यात आले. त्या वेळी आलेले अनुभव देत आहे.

१. एका जिज्ञासूंना संपर्क केला असता ‘त्या तालुक्यात ८ वर्षांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू होते’, असे कळले. त्या जिज्ञासूंना ‘सनातन प्रभात’विषयी प्रचंड ओढ होती. त्यांच्या हातात ‘सनातन प्रभात’ दिल्यावर त्यांच्या अंगावर शहारे आले. ते म्हणाले, ‘‘हे दैनिक विचारांना दिशा देणारे आहे.’’

२. दुसर्‍या एका जिज्ञासूंनी सांगितले, ‘एका रद्दीच्या दुकानात मी ‘सनातन प्रभात’चा गठ्ठा पाहिला आणि तो रद्दीच्या भावात विकत घेऊन त्यातील सर्व दैनिके वर्षभर वाचली. मी हे दैनिक चालू होण्याची वाटच बघत होतो.’ हे वाक्य ऐकून ‘जिज्ञासू हाच ज्ञानाचा अधिकारी आहे’, हे गुरूंचे वचन तंतोतंत तिथे लागू पडते, हे लक्षात आले.

३. गुरुकृपेने पहिल्याच दिवशी तेथे २५ वर्गणीदार झाले. तेव्हा ‘भगवंताचे नियोजन कसे असते ?’ हे शिकायला मिळाले. बर्‍याच वाचकांनी वार्षिक वर्गणी भरली.

४. गुरुकृपेने दैनिकाचे वितरण करणारे समाजातील वितरक हे साधकवृत्तीचे मिळाले. त्यांनी इच्छा व्यक्त केली, ‘‘हे दैनिक मोठ्या प्रमाणावर वाढवा. पुढे जाऊन मी इतर वर्तमानपत्रांचे वाटप करणे बंद करीन आणि केवळ ‘सनातन प्रभात’चे वितरण करीन.’’

नूतनीकरण आणि वसुलीची घडी भगवंतानेच साधकांच्या माध्यमातून बसवून घेतली. याची अनुभूती प्रत्येक साधक घेत आहे. भगवंताने अशी सेवा आमचा शेवटचा श्वास असेपर्यंत करून घ्यावी, हीच गुरुचरणी प्रार्थना !’

– श्री. विनोद शिंदे, पाळधी, जळगाव. (३.४.२०२३)