अंबरनाथ येथील ग्रंथाभिसरण मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम

‘ज्ञानदीप’ संस्थेकडून ग्रंथालयास विविध उपक्रमांची आकस्मित भेट !

ग्रंथाभिसरण मंडळाचे अध्यक्ष प्रवीण मथुरे यांना पत्रसंग्रह अर्पण करतांना सौ. श्रावणी फाटक आणि अन्य मान्यवर

अंबरनाथ (जिल्हा ठाणे) – येथील ग्रंथाभिसरण मंडळ या शासकीय अनुदानित सार्वजनिक वाचनालयाच्या माजी ग्रंथपाल सौ. श्रावणी फाटक यांनी ग्रंथाभिसरण मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त वाचनालयास त्यांच्या ‘ज्ञानदीप’ या संस्थेकडून विविध उपक्रम राबवून त्याची आकस्मित भेट दिली.

येथील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष, ‘अंबर भरारी’ या संस्थेचे संस्थापक अन् कार्यक्रमाचे प्रायोजक सुनील चौधरी, शतायु ग्रंथालयांचे प्रतिनिधी वक्ते ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर आणि वाचन मंदिर, भिवंडी ग्रंथालयाचे मिलिंद पळसुले , जिल्हा ग्रंथालयाचे अधिकारी प्रशांत पाटील, ग्रंथाभिसरण मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण मथुरे, कार्यवाह श्री. रवींद्र हरहरे या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित म्हणून, तर कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रदीप ढवळ हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.

सनातन-निर्मित विविध विषयांवरील ग्रंथ (संग्रहीत छायाचित्र )

या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे आणि अंबरनाथमधील विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यांचा सत्कार करतांना त्यांना सनातनचे ग्रंथ भेट देण्यात आले.

विद्याधर ठाणेकर यांनी या वेळी ग्रंथालयांची वाचकसंख्या वाढवण्यासाठी त्यांनी राबवलेल्या अत्यंत परिणामकारक आणि यशस्वी उपाययोजनांविषयीची माहिती दिली. मिलिंद पळसुले यांनी भिवंडीत मराठी ग्रंथालय चालवतांना येणार्‍या समस्या मोकळेपणाने मांडल्या.

सुनील चौधरी आणि डॉ. प्रदीप ढवळ यांनी श्रावणी फाटक राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमाला २५० हून अधिक ग्रंथप्रेमी उपस्थित होते.

ज्ञानदीप संस्थेने राबवलेले उपक्रम

. या वेळी ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील विविध संस्था आणि साहित्यिक यांनी ग्रंथाभिसरण मंडळ या संस्थेला पाठवलेल्या पत्रसंग्रहाची बांधणी करून तो मंडळाला या प्रसंगी अर्पण केला.

. ७५ विद्यार्थ्यांना ३ मासाकरिता आणि ७५ शिक्षकांना २ मासांकरिता ग्रंथालयाचे सभासदत्व प्रमाणपत्राच्या माध्यमातून देण्यात आले.

. ग्रंथाभिसरण मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण मथुरे, कार्यवाह श्री. रवींद्र हरहरे यांचा सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, ग्रंथ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. ग्रंथालयाच्या सेवानिवृत्त कर्मचारी सौ. शोभना ठाकूर यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, ग्रंथ, पुष्पगुच्छ देऊन, तसेच साडीसहित खणानारळाने ओटी भरून सन्मान करण्यात आला.

. ‘शहारातील विविध क्षेत्रांतील ग्रंथालयाचे सभासद नागरिकांनाही ग्रंथालयाचे सभासद होण्यासाठी आवाहन करत आहेत’, असे २ फलक शहरात लावण्यात आले.

लक्षवेधी

  • कु. कल्याणी फाटक हिने स्वागतगीत म्हटले.
  • संगीत विशारद श्री. चैतन्य फाटक यांनी ईशस्तवन आणि अन्य गीते सादर केली.
  • अर्धा कार्यक्रम झाल्यावर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे ध्वनीमुद्रित राज्यगीत ऐकवण्यात आले. त्या वेळी सर्व जण उठून उभे राहिले. त्या वेळी वातावरणात एक वेगळेच चैतन्य जाणवत होते आणि उपस्थितांत उत्साह जाणवत होता.