मंदिरांमधून निधीचा विनियोग हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी झाला पाहिजे ! – ह.भ.प. बापू महाराज रावकर, राष्ट्रीय वारकरी परिषद, कार्याध्यक्ष

देहू (जिल्हा पुणे) येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त तिसरे महाअधिवेशन पार पडले !

डावीकडून ह.भ.प. गुरुवर्य डॉ. हडपे महाराज, ह.भ.प. बापू महाराज रावकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे (बोलतांना), श्री. जीवन बोत्रे

देहू (जिल्हा पुणे) – ज्याप्रमाणे मदरशातून इस्लामचे शिक्षण दिले जाते, चर्चमधून ख्रिस्त्यांना शिक्षण दिले जाते. त्याचप्रमाणे मंदिरांमधून मिळणार्‍या पैशांचा उपयोग सरकारी कामांसाठी न होता हिंदूंना त्यांच्या मुला-मुलींना हिंदु धर्माचे शिक्षण मिळण्यासाठी झाला पाहिजे. जी मंदिरे सरकारने अधिग्रहित केली आहेत, ती भक्तांच्या कह्यात दिली गेली पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी प्रखरतेने केली. येथील येलवाडी येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त ८ मार्च या दिवशी तिसरे महाअधिवेशन पार पडले. त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रीय वारकरी परिषद पुणे आणि नगर जिल्हा यांच्या वतीने हे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनामध्ये हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, वारकरी संप्रदाय यांनी सहभाग घेतला. ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. सूत्रसंचालन ह.भ.प. वेणुनाथ विखे महाराजांनी केले.

या वेळी उपस्थित रायगड जिल्हा मार्गदर्शक डॉ. हडपे महाराज यांनी देहू, आळंदी आणि इतर धार्मिक स्थळे यांसारख्या ठिकाणी बिअर बार, मद्य यांच्या मांस विक्रीची दुकाने बंद व्हावीत, अशी मागणी केली. ‘मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत सातत्याने लढा देत राहू’, असे त्यांनी सांगितले.

वैशिष्ट्यपूर्ण

हिंदु जनजागृती समितीचे श्री. दिलीप शेटे यांनी लव्ह जिहाद, लँड जिहाद, हलाल प्रमाणपत्र, गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण हे विषय मांडले. यावर येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते श्री. जीवन बोत्रे म्हणाले की, हे विषय आम्हाला केवळ ऐकून ठाऊक होते; परंतु त्याच्या गांभीर्याची कल्पना आता आम्हाला आली. देशात आणि विदेशात हिंदूंची काय परिस्थिती आहे ? हे आम्हाला समितीच्या माध्यमातून कळले. आमच्याही मनात देव, देश आणि धर्म यांच्यासाठी काहीतरी करायची तळमळ आहे; परंतु आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत नव्हते. समितीच्या माध्यमातून आमच्या गावातील युवा पिढीला मार्गदर्शन मिळावे, अशी इच्छा व्यक्त करून त्यांनी समितीचे पुष्कळ आभार मानले.

उल्लेखनीय कामगिरी

समितीच्या प्रबोधनामुळे श्री. जीवन बोत्रे यांनी ग्रामपंचायतीमधून देहू या तीर्थक्षेत्री मांस, मद्य यांच्या दुकानांना अनुमती देऊ नये, असा लिखित ठराव संमत करून घेतला. अधिवेशनासाठी जागा, वीज, पाणी उपलब्ध करून देणे, जनतेमध्ये प्रसार करणे आणि इतर सहकार्यात पोपट मारुति केळकर महाराजांचा कायमस्वरूपी मोलाचा वाटा असतो.

अधिवेशनात करण्यात आलेले मागण्यांचे ठराव

ठराव ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी वाचून दाखवले. यास पुणे जिल्हा राष्ट्रीय वारकरी परिषदेचे उपाध्यक्ष ह.भ.प. अर्जुन महाराज रासकर, तसेच धर्माभिमानी यांनी ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने अनुमोदन दिले. त्यातील काही ठराव पुढीलप्रमाणे आहेत.

१. हिंदु धर्म, देवता, संत, धर्मग्रंथ, प्रथा-परंपरा आदींचा अपमान करणार्‍यांच्या विरुद्ध कठोर कायदा करावा.

२. हिंदूंच्या मंदिरातील भक्तांनी अर्पण केलेला निधी सरकारी कामांसाठी नव्हे, तर धर्मरक्षण आणि धर्मशिक्षण इत्यादी धर्मकार्यासाठी वापरण्यात यावा.

३. इंद्रायणी आणि चंद्रभागा यांतील पाण्याचे शुद्धीकरण करून वारकर्‍यांना चंद्रभागेत शुद्ध जलाने स्नान करण्यास मिळावे.

४. वारकर्‍यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावे, तसेच पंढरपूर, आळंदी, देहू ही तीर्थक्षेत्रे असल्याने वारकरी अनवाणी चालतात, तेव्हा प्रदक्षिणा मार्ग खड्डेमुक्त करावा.

हे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, स्थानिक आमदार श्री. दिलीप मोहिते पाटील आणि श्री. महेशदादा लांडगे यांना पाठवले आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंनो तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असणारी मद्यालये हि मशिदी किंवा चर्च या ठिकाणी कधीतरी दिसतात का ?