(म्हणे) ‘देश बनवू शकेल, इतका धर्म सशक्त नाही !’ – ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर

  • ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांचे धर्मद्वेषी विधान

  • पाकिस्तानची निर्मिती ही चूक असल्याचे केले विधान !

जावेद अख्तर

मुंबई – मला वाटते की, ‘माणसाने केलेल्या १० सर्वांत मोठ्या चुका’ या नावाने एक पुस्तक लिहिले, तर त्यामध्ये ‘पाकिस्तानची निर्मिती’ या चुकीचा उल्लेख असेल. पाकिस्तानची निर्मिती अतार्किक आणि कारण नसलेली होती. आता जे झाले, ते सत्य आपण स्वीकारायलाच हवे; पण जे झाले, ते योग्य नव्हते. धर्म कधीच देश बनवत नाही. धर्म एवढा सशक्त नाही की, तो देश बनवू शकेल. असे असते, तर इटली आणि युरोप हे धर्मावर आधारित देश असते. जर तुम्ही एका धर्मावर आधारित देश बनवण्याचा विचार केलात, तर ते कांद्यावरील सालीसारखे आहे, असे विधान ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी केले. (पाकिस्तानची निर्मिती ही जर चूक असेल, तर तेथील धर्म किती बळकट आहे, हे लक्षात येते; पण हिंदु धर्माच्या बळावर भारत देश टिकून असल्याने आजही तो ‘हिंदूबहुल’ म्हणून ओळखला जातो. यावरूनच सशक्त असणार्‍या हिंदु धर्माची महानता अधोरेखित होते ! – संपादक) लाहोर येथील फैज महोत्सवातून भारतात परतल्यावर अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यात ते बोलत होते. या वेळी त्यांना ‘सध्याची पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती पाहिल्यावर पाकिस्तानची निर्मिती ही चूक होती का ?’, असा प्रश्न विचारण्यात आला होता. (याविषयी पाकप्रेमींना काय म्हणायचे आहे ? – संपादक)

(म्हणे) ‘हिंदु राष्ट्र बनवणे ही चूक !’

जावेद अख्तर यांची गरळओक !

‘‘आपण पुन्हा तीच चूक करत आहोत, जी पाकिस्तानने ७० वर्षांपूर्वी केली होती. ती चूक आपल्या लक्षातच येत नाही. आता तुम्हालाही हिंदु राष्ट्र हवे आहे. इतक्या वर्षांत ते बनू शकले नाही, जग बनवू शकले नाही, तर तुम्ही काय हिंदु राष्ट्र बनवणार आहात ?’’ (जावेद अख्तरांनी म्हटले; म्हणून हिंदु राष्ट्र स्थापन झाल्याविना रहाणार नाही. साक्षात् भगवंत, ऋषिमुनी आणि संत यांचा कृपाशीर्वाद असल्याने हिंदु राष्ट्राची स्थापना ही होणारच आहे! – संपादक)