पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा साधू-संतांचा निर्धार !

पंचमहाभूत लोकोत्सवाचा ४ था दिवस !

कोल्हापूर – केवळ देशपातळीवर नाही, तर जागतिक पातळीवर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत आहे. त्यामुळे आपण आता जागे झालो नाही, तर यापुढील काळ आणि पिढी आपल्याला क्षमा करणार नाही. तरी लाखोंच्या संख्येत असलेले मठ आणि आश्रम यांचे अनुयायी, भक्तगण यांच्यासह समाजाच्या सहभागाने झाडे लावणे, प्रत्येक पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवणे आणि त्याचा पुनर्वापर करणे, कृषी आधारित शेतीस प्रोत्साहन देणे, अशा गोष्टी यापुढील काळात कराव्या लागतील. हा धागा पकडत मठ, आश्रम यांचे अनुयायी, भक्तगण यांच्या माध्यमातून पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा निर्धार पंचमहाभूत लोकोत्सवात साधू-संतांनी केला. पंचमहाभूत लोकोत्सवात २३ फेब्रुवारीला ‘अग्नितत्त्व’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामीजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या संत संमेलनात देशपातळीवर साधू-संत, मान्यवर उपस्थित होते. या संमेलनात कर्नाटक राज्याचे राज्यपाल थापरचंद्र गेहलोत, तसेच गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविक करतांना स्वामी परमात्मनानंदजी
कर्नाटक राज्याचे राज्यपाल थापरचंद्र गेहलोत

भारत स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने पंचमहाभूत लोकोत्सव महत्त्वाचे ! – प्रमोद सावंत, मुख्यमंत्री, गोवा

पंचमहाभूत लोकोत्सवात मार्गदर्शन करतांना गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पंचमहाभूतांचा इतक्या व्यापक स्तरावर आजपर्यंत कुणीच विचार केला नव्हता. हे प्रदर्शन शास्त्रज्ञ, विद्यार्थी, नागरिक अशा प्रत्येक स्तरावर लाभ करून देणारे आहे. इथे येऊन माझ्या ज्ञानात भर पडली. भारत स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने हे संमेलन म्हणजे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

भारतात होणार्‍या ‘जी-२०’ (ग्रुप ऑफ २० अर्थात् २० देशांचा समूह) संमेलनाच्या दृष्टीनेही हा लोकोत्सव एक महत्त्वाचे पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे भारत आता विश्‍वगुरु होण्यासाठी पुढे वाटचाल करत आहे.’’

हे संमेलन म्हणजे भारत विश्‍वगुरु बनण्याच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल ! – स्वामी परमात्मानंदजी महाराज

जागतिक तापमानवाढ यांसह जागतिक स्तरावर पर्यावरणाविषयी जागृती करण्याचे काम केवळ भारतच प्राधान्याने करू शकतो. या मठात आयोजित केलेले संमेलन म्हणजे भारत विश्‍वगुरु बनण्याच्या दृष्टीने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

विविध कृतींद्वारे पंचमहाभूत लोकोत्सवात साधू-संत सहभागी होऊ शकतात ! – प.पू. काडसिद्धेश्‍वर महास्वामीजी

पंचमहाभूत लोकोत्सवात संत संमेलनात मनोगत व्यक्त प.पू. काडसिद्धेश्‍वर महास्वामीजी

देशभरातील साधू-संतांनी शेतकर्‍यांना देशी गाय घेऊन देण्यात साहाय्य करणे, आश्रमस्तरावर कार्यक्रम करतांना त्यात बी-बियाणे भेट म्हणून देणे, आश्रमस्तरावरील पाणी आश्रमस्तरावरच वापरणे, आश्रमात अल्प प्रमाणात शेती करणे, ऊर्जा बचत करण्यासाठी जे जे शक्य ते सर्व कार्यक्रम राबवणे, चांगली शेती करणार्‍या शेतकर्‍यांचा सत्कार करणे अशा प्रकारची कामे करण्यात पुढाकार घेऊन ते पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी होऊ शकतात.

पंचमहाभूतांविषयी जागृती करण्याचा निर्धार आपण करूया ! – श्री. भैय्याजी जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य

या लोकोत्सवाच्या माध्यमातून अनेक गोष्टी आपण शिकून त्याचा जीवनात समावेश करावा. पंचमहाभूतांविना जगणे शक्य नसल्याने पंचमहाभूतांविषयी जागृती करण्याचा निर्धार या निमित्ताने आपण करूया.

अन्य मान्यवरांचे मार्गदर्शन

१. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजी मोरे महाराज म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील संतांनी पर्यावरण जागृतीविषयी मोठे कार्य केले असून अनेक अभंगांद्वारे प्रबोधन केले आहे. आम्ही गेल्या १० वर्षांपासून झाडे लावण्याचे काम करत आहोत. इथे उपस्थित असणार्‍या सर्वांना मी देशी झाडे लावण्याचा आग्रह करतो.’’

२. पंढरपूर येथील ह.भ.प. देवव्रत (राणा) विवेकानंद वासकर महाराज म्हणाले, ‘‘या लोकोत्सवाच्या प्रसंगी आम्ही पर्यावरणरक्षणाचे काम करण्याची शपथ घेतो, तसेच अशा प्रकारचा पंचमहाभूत लोकोत्सव जिथे जिथे होईल, तिथे तिथे वारकरी संप्रदाय हे कार्य करण्यात पुढाकार घेईल, अशी ग्वाही या प्रसंगी देतो.’’

३. निसर्गाचे रक्षण करणे, हे सर्वांचे परम कर्तव्य ! – जगद्गुरु श्री. शिवाराथी देशिकेंचा महास्वामीजी

पंचमहाभूताचे अस्तित्व कुणालाही नाकारता येणार नाही. निसर्गाचे रक्षण करणे हे सर्वांचे परम कर्तव्य आहे. पृथ्वी प्रदूषित करण्याला जेवढे हात कारणीभूत आहेत त्याच्या दुप्पट हातांनी पृथ्वीचे पर्यायाने निसर्गाचे संवर्धन व्हावे. निसर्गाप्रती सर्वांच्या मनात आदर आणि जागृती निर्माण व्हावी. या संमेलनासाठी आतापर्यंत लाखो लोकांनी उपस्थिती दर्शवली. यातच हा महोत्सव यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. या लोकोत्सवातील ज्या ज्या गोष्टी कर्नाटक राज्यात आम्हाला करता येणे शक्य आहे, त्या त्या आम्ही करू.



क्षणचित्रे

संमेलनातील साधू-संतांची गोलाकार आकारात बसण्याची व्यवस्था

१. या संमेलनात साधू-संत यांची गोलाकार आकारात बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि प्रत्येकाला ‘त्यांच्या मठ-आश्रमात काय कृती चालू आहे अन् भविष्यात काय कृती करेल’, याविषयी म्हणणे मांडण्यास सांगितले होते.

प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामीजी यांचा सत्कार करतांना कर्नाटक राज्याचे राज्यपाल थापरचंद्र गेहलोत आणि मान्यवर

२. या प्रसंगी प.पू. काडसिद्धेश्‍वर स्वामीजी यांचा कर्नाटक राज्याचे राज्यपाल थापरचंद्र गेहलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणेशाची मूर्ती आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.

३. राज्यातील अनेक भागांतून आलेल्या संत सत्संगांमुळे एकत्र कुटंबभावना निर्माण झाली होती.

पंचमहाभूत लोकोत्सवात संत संमेलनात मनोगत व्यक्त करतांना पंढरपूर येथील देवव्रत राणा महाराज वासकर

४. या संमेलनासाठी वारकरी संप्रदाय, तसेच महिला संत यांची उपस्थितीही लक्षणीय होती.