ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा 

ठाणे, १७ जुलै (वार्ता.) – ठाणे शहरातील प्रभाग क्रमांक १३ मधील संत ज्ञानेश्वरनगर, लुईसवाडी, वैतीवाडी आणि रामचंद्रनगर परिसरात मागील २५ वर्षांपासून गढूळ अन् दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे, असा आरोप करत नागरिकांनी १७ जुलैला ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढला. (महानगरपालिका क्षेत्रात शुद्ध पाणी मिळण्यासाठी नागरिकांना मोर्चा काढावा लागतो यापेक्षा दुर्दैव ते काय ? – संपादक) ठाकरे गटाचे नगरसेवक शहाजी (गणेश) खुस्पे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. नागरिकांनी दूषित पाण्याच्या बाटल्या दाखवून निषेध नोंदवला.

प्रत्येक पावसाळ्यात येथे मातीमिश्रित पिवळसर पाणी येत असल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांची व्यथा ऐकल्यानंतर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी ही गोष्ट गंभीर असल्याचे मान्य करत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. (केवळ आश्वासन नको, तर ठोस कृती हवी. – संपादक)