‘रामचरितमानस’ ग्रंथाचा अवमान करणारे स्वामी प्रसाद मौर्य आणि चंद्रशेखर यादव यांना अटक करा !

हिंदुत्वनिष्ठांची एकमुखी मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रयागराजच्या माघ मेळ्यामध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ आंदोलन

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘‘रामचरितमानस’ हा कचरा ग्रंथ आहे’, असे म्हटले, तर दुसरीकडे बिहारचे शिक्षणमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते चंद्रशेखर यादव यांनी ‘‘रामचरितमानस’ हा द्वेष पसरवणारा ग्रंथ आहे आणि त्यावर बंदी घातली पाहिजे’, असे म्हटले आहे. त्यामुळे ‘रामचरितमानस’ ग्रंथाचा अवमान करणारे स्वामी प्रसाद मौर्य आणि चंद्रशेखर यादव यांना अटक करा’, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’मध्ये करण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने माघ मेळ्यामध्ये वरील आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनाला उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अवधेश राय, ‘जांबाज हिंदुस्थानी’ संघटनेचे नेते अधिवक्ता आलोक आझाद, डॉ. अभिषेक केसरवानी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत वैती यांनी संबोधित केले.

आंदोलनात करण्यात आलेली अन्य मागणी : कर्नाटकमध्ये के.एस्. भगवान यांनी प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांच्याविषयी अतिशय खालच्या पातळीवर टीका केली. त्यामुळे अशा प्रकारे सातत्याने होणारा हिंदु देवीदेवतांचा अवमान थांबवण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित ‘ईशनिंदाविरोधी कायदा’ करावा.

वैशिष्ट्यपूर्ण : माघ मेळ्यासाठी आलेले काही साधू या आंदोलनामध्ये सहभागी झाले.