पाकची मानवी ‘ॲप्स’  भारत सरकार कधी प्रतिबंधित करणार ?

लडाख आणि गलवानच्या खोर्‍यातील चिनी सेनेशी झालेल्या संघर्षानंतर भारत सरकारने अनेक चिनी आस्थापने अन् त्यांची विविध ‘ॲप्स’ यांवर बंदी घालून चांगलीच कोंडी केली. एका बाजूला सैनिकांद्वारे सीमेवरची कोंडी आणि दुसर्‍या बाजूला आर्थिक कोंडी, अशी ही रणनीती पुष्कळ उपयोगी ठरल्याने चीन घाबरला आहे; पण त्याच वेळी त्यापेक्षाही भयंकर अशा पाकिस्तानी ‘ॲप्स’ना कुणी रोखायचे, हा प्रश्न विचारणे भाग आहे. ॲप्स म्हणजे स्मार्टफोन वा संगणकामध्ये त्यांना सामावून घेतले जाते आणि त्यांचा विविध कामासाठी उपयोग होत असतो; पण आपल्या भ्रमणभाष वा संगणकात घुसलेली ही ॲप्स उलट्या बाजूने खातेदाराची माहिती किंवा मोक्याच्या गोष्टी बाहेर पळवून नेत असतात, असाही आक्षेप घेतला जातो. थोडक्यात पूर्वीच्या काळात शत्रूचे हस्तक वा हेरगिरी करणारे जसे आपल्या समाजात मिसळून आपल्याशीच दगाफटका करायचे, तसाच काहीसा प्रकार ॲप्सद्वारे होत असल्याचा आक्षेप आहे. अर्थात् पाकिस्तान तंत्रज्ञानात तितका पुढारलेला नसून त्याने भारतात मोठ्या नावाजलेल्या व्यक्ती आणि प्रतिष्ठित यांनाच स्वतःचे ॲप्स म्हणून बनवलेले आहे.

मागील दोन दशकांत अशा मानवी ॲप्सद्वारे पाकिस्तान भारतात अनेक उचापती करत राहिला आहे. तसे बघायला गेल्यास असे लोक वरकरणी विदेशी हस्तक वा हेर वगैरे वाटणारे नाहीत; कारण ते नेहमी सामाजिक न्यायाच्या गोष्टी आणि वैचारिक भाषेत बोलत असतात; पण वास्तवात त्यांचे काम देशाला अन् समाजाला पोखरण्यासाठीच चालू असते. जेव्हा परकीय आक्रमण होते, तेव्हा ते लोक अतिशय सावधपणे मायभूमीशी दगाबाजी करत असतात. बरखा दत्त हे त्यापैकीच एक नाव आहे आणि तिचे पाकिस्तानप्रेम आजवर कधीच लपलेले नाही; पण ती येथे पत्रकार म्हणून मिरवत असली, तरी व्यवहारात ती कायम पाकिस्तानचे हितसंबंध जपत राहिलेली आहे. त्याचे वेगवेगळे दाखलेही उपलब्ध आहेत. मुद्दा इतकाच आहे की, ही पाकची मानवी ॲप्स भारत सरकार कधी आणि कशी प्रतिबंधित करणार आहे ?

ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर

१. पाकच्या तत्कालीन पंतप्रधानांनी भारतीय पंतप्रधानांवर केलेल्या टीकेच्या वेळी बरखा दत्त उपस्थित असणे आणि त्यांच्यावर टीका होऊ लागल्यावर तिने स्वतः खुलासा करणे

वर्ष २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची रणधुमाळी माजवली होती, तेव्हा त्यांनी बरखा यांच्या एका पापकर्माचा जाहीर उल्लेख नाव घेतल्याविना केला होता. तेव्हा तिचा जळफळाट जगाने बघितलेला आहे. मनमोहन सिंग अखेरच्या वर्षात संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीला अमेरिकेत गेलेले होते आणि पाकचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफही तिथे आलेले होते. शरीफ यांनी पाकिस्तानी पत्रकार मंडळींना चहापानासाठी बोलवलेले होते आणि त्यात बरखाचाही समावेश होता. अन्य कुणी भारतीय पत्रकार त्यात नव्हते. त्या गप्पांमध्ये शरीफ यांनी ‘मनमोहन सिंग म्हणजे पाणवठ्यावरची गावंढळ महिला कुरकुरते’, अशी हेटाळणी केली होती.

खरे तर निषेध म्हणून भारतीय पत्रकारांनी तिथून उठून जायला हवे होते, असे सूत्र मोदी यांनी मांडले होते. येथे त्यांनी बरखा यांचे नावही घेतलेले नव्हते; पण ‘खाई त्याला खवखवे’, या उक्तीप्रमाणे बरखा तिच्या एन्.डी. टिव्ही वाहिनीवर आली आणि खुलासा दिला. ‘आपण तिथे नव्हतेच’, असा खुलासा देण्याची काय आवश्यकता होती ? पण तिला समोर यावे लागले. येथे गंमतीची गोष्ट म्हणजे बरखाच्या त्या खुलाशाला दुजोरा द्यायला पाकिस्तानी संपादक हमीद मीर पुढे सरसावले. आणखी गंमत अशी की, याच मीर यांनी त्यांच्या पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर तोच विषय घेऊन सिंग यांची खिल्ली उडवणारा कार्यक्रमही केलेला होता. ही बरखा यांची ख्याती आहे.

२. वृत्तवाहिनीवरील चर्चासत्राद्वारे बरखा दत्त यांनी पाकला संकेत देणे

हा विषय येथेच संपत नाही. ‘पठाणकोटच्या घातपाती आक्रमणानंतर भारताचे पाकला उत्तर काय असेल ?’, याची चर्चा चालू होती. तेव्हा बरखा पाकिस्तानला कसे साहाय्य करत होत्या, तेही समजून घेतले पाहिजे. आपल्या वृत्तवाहिनीवर भारताच्या विविध निवृत्त अधिकार्‍यांना आमंत्रित करून बोलतांना त्या अगत्याने एक प्रश्न विचारायच्या, ‘‘भारत पाकला शस्त्रानेच उत्तर देईल का ? प्रतिआक्रमण वा लष्करी उत्तर देईल का ?’’ त्यावर नकारार्थी उत्तर आल्यानंतर खातरजमा करत त्या पुन्हा एक वाक्य सतत बोलायच्या, ‘‘म्हणजे पाकविरोधी लष्करी कारवाईची शक्यता नाही.’’ एकप्रकारे हा पाकचे सेनाधिकारी आणि सरकार यांना दिलेली ही चेतावणी वा संकेतच होता. थोडक्यात येथील वृत्तवाहिनीवरील चर्चा रंगवतांना बरखा त्यांना सांगत होती, ‘‘निश्चिंत रहा. भारत पाकविरोधात कुठलीही लष्करी कारवाई करण्याची शक्यता नाही. खुद्द माजी सेनाधिकारीच त्याची ग्वाही देत आहेत.’’ हा संकेत कशाला मानायचा ?, तर बरखा सोडून अन्य कुठल्याही वृत्तवाहिनीवर चर्चेत असा प्रश्न विचारला जात नव्हता आणि सातत्याने वदवूनही घेतला जात नव्हता.

३. भारतीय सैन्याने बरखा दत्त आणि पाकिस्तान यांना दिलेला धक्का

खरेतर त्याच संकेताने पाकिस्तानचा घात झाला; कारण बरखावर विसंबून पाकसेना निश्चिंत राहिली आणि ‘सर्जिकल स्ट्राईक’ होऊन गेल्यावर त्यांना जाग आली. त्यामुळेच बरखा किंवा तत्सम पोसलेले भारतातील पाकचे हस्तक आता कसे निरुपयोगी बनले आहेत, याची त्यांनाही खातरजमा होत गेली; कारण भारतीय हेरखात्याने बरखाच्या पाकधार्जिणेपणाचा मोठ्या खुबीने उपयोग करून घेतला आणि तिच्याद्वारेच पाकला धक्का दिला.

४. बरखा दत्त यांनी पाकला भारतात पुलवामासारखे मोठे घातपाती आक्रमण करण्याचा सल्ला देणे

वरील घटनेमुळे आता बरखाची किंमत तिथेही घटली आहे आणि भारतातील विश्वासार्हता कधीच संपलेली आहे. त्यामुळे असे अनाथ झालेले पाकचे हस्तक हळूहळू निकामी निरुपयोगी ॲप्सच बनले आहेत. स्वतःची उपयुक्तता अजूनही असल्याचे सिद्ध करण्याचा केविलवाणा खेळ त्यांना करावा लागतो आणि त्याचेच ताजे उदाहरण समोर आले आहे. आता बरखा या पाकिस्तानला भारत विरोधातील कारवाईचे सल्ले देऊ लागली असून त्यासाठी रणनीतीही सांगू लागली आहे. पाकपेक्षाही काश्मीर हातून निसटल्याची वेदना बरखा यांना किती सतावते आहे, त्याचा अस्सल नमुनाच ताज्या वक्तव्यातून सादर केला आहे. जगातील सगळ्या मंचावर पाकच्या काश्मिरी रडगाण्याला कुणी भीक घालत नाही. त्यामुळे आता फक्त एकाच मार्गाने पाकला काश्मीरचा विषय शेष ठेवता येईल आणि तो मार्गच बरखा भारतात बसून पाकला शिकवत आहेत. तो मार्ग कोणता ?

काही दिवसांपूर्वी बरखा दत्त यांनी एका व्हिडिओमधून पाकिस्तानला काश्मीर हातातून जायला नको असेल, तर काय करावे लागेल ? याचा सल्ला दिला आहे. तिच्या म्हणण्यानुसार अजून पाकव्याप्त काश्मीर वाचवायचा असेल, तर पाकने भारतातील काश्मीरमध्ये पुलवामासारखे मोठे घातपाती आक्रमण केले पाहिजे. असे झाले तरच जगाचे लक्ष त्याकडे वेधले जाऊ शकते आणि जगाला नव्याने काश्मीरकडे वळावे लागेल. भारतीय काश्मीरमध्ये असे भयानक आक्रमण करणे शक्य नसेल, तर पाकने भारताच्या अन्य भागात कुठेतरी मोठे घातपाती आक्रमण करून जगाचे लक्ष वेधून घ्यावे लागेल. अन्यथा काश्मीरचा विषय पाकिस्तानच्या हातातून निसटलेला आहे.

५. बरखा दत्त यांचा पाकला सल्ला म्हणजे पत्रकारिता कि आतंकवाद टिकवून ठेवण्यासाठी सुचवलेली रणनीती ?

ज्या महिला पत्रकाराला काश्मीरमध्ये सामान्य लोकांना सुखनैव जगता येत नाही वा विविध प्रतिबंध आहेत, म्हणून तेथील लोकांविषयी कायम जिव्हाळा वाटत राहिला आहे, तिला तिथे पुलवामासारखे आक्रमण याचा अर्थ कळतो का ? ते घातक आक्रमण केवळ सैनिकांवरच होत नसते, तर त्यात अनेक नागरिकही मारले जातात. मग तसे आक्रमण वा भारतात अन्यत्र प्राणघातक आक्रमण करण्याचा सल्ला देऊन बरखा दत्त काय सांगू इच्छित आहेत ? त्या असा आग्रह धरून निरपराधांच्या जीवाशी खेळण्याचा सल्ला देतात, तेव्हा त्याला पत्रकारिता वा विश्लेषण म्हणता येईल कि आतंकवाद टिकवून ठेवण्यासाठी सुचवलेली रणनीती म्हणायची ?

६. पाक हस्तक आणि दलाल यांचा बंदोबस्त करणे आवश्यक !

दोन देशांत सख्य असावे किंवा दोन्ही देशातील सामान्य जनतेच्या सुखरूप जगण्याला प्राधान्य असायला हवे, एवढेही पत्रकार म्हणून असणारे कर्तव्य बरखा यांच्या डोक्यात बाकी राहिलेले नाही की, आपण पाक हस्तक वा पाक ॲप्स असल्याचे लपवून बोलावे, याचेही भान ती गमावून बसली आहे ? अशा कित्येक पाक हस्तक आणि दलाल यांचा बंदोबस्त केल्याविना भारताची सुरक्षा खात्रीची होऊ शकत नाही. त्यांना कायदेशीर मार्गाने प्रतिबंधित करता येत नाही; म्हणून त्यांची समाजात ‘छि थू’ करणे एवढाच एकमेव मार्ग असू शकतो. कारण गुन्हे संहिता वा दंडविधानाच्या कलमांमध्ये अशा वागण्याला गुन्हा ठरवणारी कलमे वा तरतुदी नाहीत ना ?

– ज्येष्ठ पत्रकार श्री. भाऊ तोरसेकर, मुंबई (संदर्भ : ‘जागता पहारा’ ब्लॉग)