संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनवण्यासाठी फ्रान्सचा भारताला पाठिंबा

चीन सतत करत आहे भारताला विरोध !

न्यूयॉर्क (अमेरिका) – जगातील सर्वांत शक्तिशाली असलेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अन्य बलशाली देशांचा सहभाग वाढवण्याची वेळ आली आहे. फ्रान्स ही मागणी सातत्याने करत आहे. परिषदेने इतर देशांनाही समवेत घ्यावे, जेणेकरून ही परिषद अधिक सशक्त होईल, अशी आमची इच्छा आहे. सुरक्षा परिषदेचे काम अधिक चांगले करण्यासाठी २५ सदस्य जोडले जाऊ शकतात. यांमध्ये आफ्रिकन देशांचाही समावेश करावा, असे सांगत फ्रान्सने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी भारताला उघडपणे पाठिंबा दिला. याआधी १८ नोव्हेंबरला ब्रिटननेही भारताच्या बाजूने ही मागणी केली होती. फ्रान्सने भारतालाच नव्हे, तर जर्मनी, ब्राझिल आणि जपान यांनाही सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य बनवण्याची मागणी केली आहे. सुरक्षा परिषदेतील पालटाविषयी संयुक्त राष्ट्रातील भारतीय अधिकारी रुचिरा कंबोज यांनी सूत्र उपस्थित केले होते.

सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य होण्यासाठी भारत दीर्घकाळापासून प्रयत्न करत आहे; मात्र भारताच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा हा चीन आहे. चीन कायम वेगवेगळ्या बहाण्याने भारताच्या स्थायी सदस्यत्वाला विरोध करत आला आहे. यंदाच्या वर्षी जुलैमध्ये लोकसभेत माहिती देतांना सरकारने सांगितले होते की, परिषदेच्या ५ स्थायी सदस्यांपैकी ४ सदस्यांचा पाठिंबा आहे. भारताला कायमस्वरूपी जागा मिळावी यासाठी केवळ चीनचा पाठिंबा नाही. त्यांच्याशी याविषयी सतत चर्चा केली जात आहे.

संपादकीय भूमिका

  • भारताशी उघड शत्रुत्व पत्कारणार्‍या चीनला भारत मात्र व्यापाराच्या माध्यमातून लाखो कोटी रुपये देतो आणि हाच पैसा चीन भारतविरोधी कारवायांसाठी वापरतो ! त्यामुळे सरकारने चीनशी शत्रूप्रमाणे वागून त्याला समजेल अशा भाषेत धडा शिकवावा !