शहापूर (ठाणे) येथे पोलीस उपनिरीक्षकांकडून गोरक्षकांना शिवीगाळ आणि आक्रमण !

ठाणे, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – शहापूर तालुक्यातील डोळखांब परिसरात रानविहीर घाटामध्ये जनावरांची वाहतूक करणारा टेंपो गोरक्षकांनी पोलिसांच्या साहाय्याने  पकडला होता, तर एक टेंपो निघून गेला. या कारवाईविषयी चौकशी करण्यासाठी गेलेले गोरक्षक नरेश गोडांबे यांना पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पवार यांनी शिवीगाळ करत त्यांच्यावर आक्रमण केले. याचा निषेध करत येथील हिंदुत्वनिष्ठ नागरिक आणि श्रमजीवी संघटना यांच्या वतीने शहापूर येथील उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांना निवेदन दिले आहे. यामध्ये पवार यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध करत डोळखांब बाजारपेठ परिसरात १३ ऑक्टोबर या दिवशी बंद पाळला होता.

पोलिसांकडून धर्मांध कसायांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा गोरक्षकांचा आरोप !

‘ग्रामस्थांची जनावरे चोरून नेणारा हा टेंपो, ३ आरोपी आणि जनावरे यांना पोलीस ठाण्याच्या ठिकाणी आणण्यात आले होते; मात्र गोरक्षक आणि ग्रामस्थ तेथे नसल्याचा अपलाभ घेत आरोपी अन् जनावरे यांना पोलिसांनी सोडून दिले’, असे गोरक्षकांचे म्हणणे आहे. ‘डोळखांब परिसरात यापूर्वीही गोरक्षकांवर धर्मांध कसायांनी आक्रमण केल्याच्या घटना घडल्या आहेत; मात्र पोलीस त्यांची नोंद न घेता धर्मांधांना पाठीशी घालतात’, असे गोरक्षकांचे म्हणणे आहे. ‘अशा पोलिसांवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

शिवीगाळ करणारे पोलीस म्हणजे पोलीस विभागाला लज्जास्पद ! असे पोलीस आणि गावगुंड यांच्यात भेद तो काय ?

शिवीगाळ आणि आक्रमण करणारे पोलीस त्यांच्या पदावर रहाण्याच्या योग्यतेचे तरी आहेत का ? अशांना बडतर्फच करायला हवे !