ग्रामीण भागातील मुलींना बसचा पास विनामूल्य मिळण्यासाठी कन्या शाळेचा एस्.टी. प्रशासनाकडे पत्रव्यवहार !

सातारा, २४ जुलै (वार्ता.) – ग्रामीण भागातील मुलींसाठी ज्ञानाची कवाडे उघडी रहावीत, यासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सातारा शहरातील कन्या शाळेच्या वतीने या भागातील मुलींसाठी बसचा पास विनामूल्य मिळवून देण्याचे प्रयत्न चालू आहेत. शासनाच्या ‘अहिल्याबाई होळकर विनामूल्य बस पास योजने’साठी कन्या शाळा प्रशासनाच्या वतीने एस्.टी. प्रशासनाकडे पत्रव्यवहार चालू आहे, अशी माहिती शाळा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. एस्.टी. प्रशासनाकडूनही या योजनेसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे समजते.

सातारा शहराच्या जवळील खेड्यांतून येणार्‍या मुलींकडे प्रवासभाड्याएवढेही पैसे नसतात. त्यामुळे काही मुलींना शालेय शिक्षणापासून वंचित रहावे लागते. या योजनेचा लाभ सर्वच विद्यार्थीनींना मुलींना होईल.