वारकरी शिक्षण संस्थेतील ४३ मुलांना विषबाधा !

वारकरी शिक्षण संस्थेतील ४३ मुलांना विषबाधा

पंढरपूर (जिल्हा सोलापूर), १९ जुलै (वार्ता.) – शेगांव दुमाला येथील विठ्ठल आश्रमात वारकरी शिक्षण घेणार्‍या ४३ मुलांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिले. विषबाधा झालेल्यांना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

विठ्ठल आश्रमात वारकरी शिक्षण घेणारी मुले शेजारील मोतीराम महाराज मठात पंगत असल्याने जेवायला गेली होती. जेवणानंतर ४३ मुलांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखी यांचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे. येथील जेवणातील सर्व पदार्थांचे नमुने अन्न आणि औषध प्रशासन विभागाने प्रयोगशाळेत पडताळणीसाठी पाठवले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश अन्न आणि औषध प्रशासनाला दिल्याचे अप्पर जिल्हाधिकारी जाधव यांनी सांगितले.