अनुभूती का येते ? याचे शास्त्र सांगणारे ज्ञान !

अनुभूती येणे हे सर्वस्वी साधकाच्या भावावर अवलंबून

‘अनुभूती येणे हे सर्वस्वी साधकाच्या भावावर अवलंबून असते. जसा भाव, तशी अनुभूती. समोरच्या उन्नतांची आध्यात्मिक पातळी कितीही असली, तरी साधकाचा भाव जेवढा असेल, त्या प्रमाणातच अनुभूतीचे मापन होते.’

– ब्रह्मर्षि (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून, २१.१२.२००३)

ईश्वराप्रती असलेल्या भावामुळेच जिवाला अनुभूती येणे

‘भावऊर्जा म्हणजे जिवाच्या ईश्वराप्रती असलेल्या भावामुळे कार्यरत झालेला मनःशक्तीचा वेग. जिवाच्या ईश्वराप्रती असलेल्या भावावरच मनाचा वेग अवलंबून असतो. मनाचा वेग जेवढा जास्त, तेवढी जिवाला अल्प कालावधीत अनुभूतीची जाणीव होते. ईश्वराप्रती असलेल्या भावामुळेच जिवाला अनुभूती येते. या भावऊर्जेच्या बळावरच अनुभूतीच्या जाणिवेचा कालावधी ठरतो.’

– एक विद्वान (श्रीचित्शक्ति सौ. अंजली मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.१०.२००४)

भावामुळे ईश्वर एखाद्याच्या माध्यमाद्वारे अनुभूती देणे

‘एखादे माध्यम पात्र नाही; पण जिवाची श्रद्धा अन् भाव त्या माध्यमावर अवलंबून आहे असे असते, तेव्हा ईश्वर त्या माध्यमातूनही अनुभूती देतो. जिवाची सर्वाधिक श्रद्धा आणि भाव ज्याच्यावर आहे, त्याचे रूप घेऊन देवता अनुभूती देतात; म्हणून बहुतांश सनातनच्या साधकांना प.पू. डॉक्टरांच्या रूपात अनुभूती येतात.’

– ब्रह्मर्षि (श्री. राम होनप यांच्या माध्यमातून, २५.८.२००३ आणि ९.९.२००३)