अतिक्रमण, अनधिकृत वाहतूक यांमुळे पुणे शहरातून वहाणाऱ्या मुठा उजवा कालव्याला गळती !

पुणे – खडकवासला ते फुरसुंगीपर्यंतच्या शहरातून वहाणाऱ्या मुठा उजवा कालव्यानजिक झालेली अतिक्रमणे, रस्ते आणि कालव्यात टाकलेला कचरा, राडारोडा यांसारख्या विविध कारणांनी वानवडी येथे कालव्यातून पुन्हा गळती चालू झाली आहे. जलसंपदा विभागाकडून गळती थांबवली आहे. तरीही भविष्यात कालवा फुटीची घटना घडण्याची भीती नाकारता येत नाही.

खडकवासला धरण ते हडपसर या २८ किलोमीटरच्या मार्गात संरक्षक भिंतीला तडे गेलेले आहेत, तसेच भराव खचून धरणाचा पाया कमकुवत झाला आहे. धायरीतील नांदेड सिटी, वडगाव बुद्रूक पुलाजवळ नादुरुस्त झालेल्या कालव्याच्या संरक्षक भिंती, पर्वती पायथा तेथील भिंती, हडपसरमधील शिंदे वस्ती आणि पांढरे मळा, ससाणेनगर येथे पाटामध्ये साचलेला गाळ अशी १४ ठिकाणे धोकादायक झालेली आहेत.

प्रतिवर्षी पावसाळ्यापूर्वी मुठा योजना कालव्याची कामे जलसंपदा विभागाकडून पूर्ण करण्यात येतात; परंतु मुठा उजवा कालव्यानजिक बरीच अतिक्रमणे, अनधिकृत रस्ते आणि त्या रस्त्यांवरून होणाऱ्या अवैध वाहतुकीमुळे कालव्याच्या मातीचा भराव खचत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे.

संपादकीय भूमिका

  • प्रशासन अतिक्रमणे हटवत का नाही ? कालव्याची गळती जनतेच्या जिवावर बेतणारी आहे, हे लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना काढणे आवश्यक आहे.