आपत्काळात देवतेला प्रसन्न कसे करावे ?

अन्नपूर्णाकक्षात प्रसाद बनवण्यापूर्वी अग्निदेवाला प्रार्थना करावी !

 (भाग ४)

पू. तनुजा ठाकूर

१. अन्नपूर्णाकक्षात चूल असतांनाच्या काळात केले जाणारे सर्व संस्कार घरोघरी गॅस सिलिंडर आल्यावर लुप्त होणे

‘मी माझ्या दोन्ही आजींना (आईची आई आणि वडिलांची आई) चुलीमध्ये अग्नि प्रज्वलित करतांना पहायचे. आजी सर्वांत प्रथम चुलीला नमस्कार करत असे. चुलीवर कोणताही पदार्थ बनवण्यापूर्वी त्यासाठी लागणारे काही घटक चुलीत अग्निदेवाला अर्पण करत असे. आमच्या घरामध्ये जोपर्यंत कोळशाची चूल वापरली जायची, तोपर्यंत माझी आई चुलीमध्ये डाळ किंवा तांदूळ यांचे दाणे टाकायची. त्यानंतर हळूहळू सर्वांच्याच घरी गॅस सिलिंडर आल्याने हे सर्व संस्कार कधी लुप्त झाले, ते समजलेच नाही.

२. अन्नपूर्णाकक्षातील पावित्र्य टिकवण्याच्या गोष्टी आईकडून शिकता येणे आणि श्रीगुरूंनीही त्याविषयी अनेक माध्यमांतून शिकवणे

आमच्या घरात पूजा, तसेच कर्मकांडातील अन्य अनुष्ठानेही केली जातात. माझी आई सर्व नियम पाळून अत्यंत भावपूर्णपणे ते सर्व करत असे. तिच्यासाठी ‘पावित्र्य’ हा अत्यंत महत्त्वपूर्ण घटक होता. अन्नपूर्णाकक्षातील पावित्र्य टिकवण्याच्या काही गोष्टी मी तिच्याकडूनच शिकले. अन्य सूत्रे श्रीगुरूंकडून (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून) शिकले. ते मला अनेक माध्यमांतून शिकवत आहेत.

३. अग्निदेवाला करावयाची प्रार्थना !

सध्या सर्वच घरांत गॅस सिलिंडर असल्याने त्यात आपण अग्निदेवाला काहीही अर्पण करू शकत नाही. जेव्हा आपण प्रातःकाळी अन्नपूर्णाकक्षात सेवेस आरंभ करतो, तेव्हा सर्वप्रथम अग्निदेवाला प्रार्थना करावी, ‘हे अग्निदेवा, मी आजच्या सेवेला आपल्याच कृपेने आरंभ करत आहे. आपण या आपत्काळातसुद्धा आमच्यासाठी अशा आधुनिक माध्यमातून उपलब्ध आहात; म्हणून आम्ही आपल्याप्रती कृतज्ञ आहोत. आज मी जो काही प्रसाद बनवणार आहे, त्यात आवश्यक तेवढे तेजतत्त्व आपणच समाविष्ट करून तो पदार्थ ग्रहण करण्यायोग्य बनवावा. आपली कृपादृष्टी आमच्यावर टिकून रहावी.’ ही प्रार्थना केल्यानंतरच शेगडीवर प्रसाद करण्यासाठीचे भांडे ठेवावे.

४. तिसऱ्या महायुद्धकाळात गॅस उपलब्ध होणार नसल्याने गोवऱ्या, लाकूड किंवा कोळसा यांचा वापर करून स्वयंपाक करण्यास शिका !

शक्य असल्यास गोपालनाला आरंभ करावा. गोबरगॅसचाही वापर करू शकतो; कारण तिसऱ्या महायुद्धाच्या वेळी किंवा त्यानंतर सी.एन्.जी. गॅस उपलब्ध होणे अत्यंत कठीण होणार आहे. स्थानिक स्तरावर कोळसाही न मिळाल्यास लाकडाचा वापर करून स्वयंपाक करावा लागेल; पण सध्या लाकूडही अत्यंत महाग किंमतीत मिळते. मोकळे अंगण उपलब्ध असल्यास गोवऱ्या, लाकूड किंवा कोळसा यांचा वापर करून किमान एक वेळचे काही पदार्थ बनवण्याची तरी सवय करावी.

असे केल्यास येणाऱ्या आपत्काळात तुम्हाला फारसा त्रास होणार नाही. त्यामुळे आतापासूनच अग्निदेवाला प्रसन्न ठेवायला हवे.

५. आपत्काळाच्या अनुषंगाने ‘उपासना’च्या आश्रमात केलेली पूर्वसिद्धता !

आमच्या ‘उपासना’च्या आश्रमात गोवऱ्या किंवा लाकडाची चूल बनवण्यासाठी एक वेगळाच अन्नपूर्णाकक्ष आहे. तेथे ‘गोबरगॅस’ही लावून घेतला आहे. तेथील गोवंशियांना खाण्यासाठी देण्यात येणारा गव्हाचा जाड रवा आम्ही गोवऱ्यांवरच शिजवतो. दूधसुद्धा गोवरीच्या चुलीवरच गरम करतो. वेळोवेळी ‘बाटी’ (कणकेचे गोळे) हेसुद्धा गोवऱ्यांच्या धगीवरच भाजले जाताते. आपत्काळाच्या दृष्टीने सर्व साधक आणि कार्यकर्ते यांची पूर्वसिद्धता व्हावी, यासाठी मी आतापासूनच हे सर्व करवून घेत आहे.

मी जे तुम्हाला सांगत आहे, ते स्वतःही आचरणात आणत आहे. कोणतीही कृती आपण स्वतः करून मग इतरांना सांगितल्यास लोक ती सहजतेने करतात आणि त्यांना त्याचा लाभही होतो.’

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (३१.१.२०२२)