लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरी येथील जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करा ! – हिंदु जनजागृती समिती

‘भारतीय असंतोषाचे जनक’ असणारे लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरी येथील जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करा ! – मनोज खाडये, समन्वयक, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण प्रांत आणि गुजरात राज्य, हिंदु जनजागृती समिती

  • हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थानाची दुरवस्था’ याविषयी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद

  • पुरातत्व विभागाला जागे करण्यासाठी मुंबई, पुणे आणि रत्नागिरी येथे आंदोलन करणार !

देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे आयुष्य वेचणार्‍या क्रांतीकारकांचा विसर पडणे, हे सरकारी यंत्रणा त्यांच्याप्रती कृतघ्न असल्याचेच द्योतक आहे ! ही स्थिती त्यांना लज्जास्पद आहे ! निदान जनतेने तरी असा कृतघ्नपणा दाखवू नये आणि क्रांतीकारकांची स्मारके सुस्थितीत ठेवण्यासाठी सरकारकडे आग्रह धरावा ! – संपादक

‘भारतीय असंतोषाचे जनक’ असणारे लोकमान्य टिळक

रत्नागिरी, २० नोव्हेंबर (वार्ता.) – भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे, स्वातंत्र्यसंग्राम संपूर्ण भारतभर पसरवणारे, ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असणारे लोकमान्य टिळक यांच्या येथील टिळक आळीतील जन्मस्थानाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पुरातत्व विभागाने या दुरवस्थेकडे तात्काळ लक्ष देऊन त्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, तसेच लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण प्रांत आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केली. त्यासाठी पहिल्या टप्प्यात मुंबई, पुणे आणि रत्नागिरी येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील मारुति मंदिर येथील शेषाराम सभागृहात २० नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. राकेश नलावडे, अपरांत संघटनेचे श्री. दीपक जोशी आणि समितीचे श्री. विनोद गादीकर उपस्थित होते. आरंभी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांनी प्रस्तावना आणि मान्यवरांची ओळख करून दिली.

डावीकडून श्री. दीपक जोशी, श्री. राकेश नलावडे, बोलतांना श्री. मनोज खाडये आणि श्री. संजय जोशी

श्री. मनोज खाडये पुढे म्हणाले की,

१. लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानाच्या छप्पराची कौले फुटली आहेत, तसेच भिंतींवर शेवाळ आले आहे. काही ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत.

२. पुरातत्व विभागाने जन्मस्थानाच्या प्रवेशद्वाराबाहेर लावलेला फलक गंजला असून तो नीट वाचताही येत नाही.

३. या जन्मस्थानाला भेट देण्यासाठी देशभरातून शेकडो पर्यटक, तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सहली येत असतात. ते जन्मस्थानाची माहिती पुस्तिका मागतात; मात्र जन्मस्थानाच्या ठिकाणी साधी माहिती पुस्तिकाही उपलब्ध नाही.


हे पण वाचा –

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, असे ठणकावणार्‍या लोकमान्य टिळक यांचे रत्नागिरीतील जन्मस्थान दुरवस्थेत !
https://sanatanprabhat.org/marathi/529131.html

लोकमान्‍य टिळक यांचे देहावसान झालेल्‍या मुंबईतील ‘सरदारगृह’ या वास्‍तूची दुरवस्‍था !
https://sanatanprabhat.org/marathi/529257.html


४. वास्तविक पहाता या ठिकाणी लोकमान्य टिळकांविषयी माहिती देणारा माहितीपट, त्यांच्याविषयीचे लिखाण उपलब्ध व्हायला हवे; मात्र या सर्वांचाही येथे अभाव आहे.

५. लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानाची झालेली दुरवस्था पहाता ही स्थिती पालटण्यासाठी लोकमान्य टिळक यांना अपेक्षित अशा स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर होणे आवश्यक आहे.

लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानाच्या दुरवस्थेविषयी पत्रकार परिषद घ्यावी लागणे दुर्दैवी ! – राकेश नलावडे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या बंगल्यांचे नूतनीकरण होत असते; मात्र लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानाकडे दुर्लक्ष झाले आहे. या जन्मस्थानाची दुर्दशा होणे आणि त्याविषयी अशी पत्रकार परिषद घ्यावी लागणे दुर्दैवी आहे. ज्या राष्ट्रपुरुषांनी देशासाठी बलीदान दिले, अशा राष्ट्रपुरुषांच्या स्मारकाची अशी दुरवस्था, म्हणजे त्यांच्या कार्याचा अनादर केल्यासारखेच आहे. त्यामुळे या लढ्यात आम्ही हिंदु जनजागृती समितीच्या समवेत असून आम्हीही हा लढा लढू.

लोकमान्य टिळक यांच्याविषयी बोथट झालेल्या जाणिवा धारदार करायला हव्यात ! – दीपक जोशी, अपरांत संघटना

लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानाची झालेली दुरवस्था ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ज्यांनी आपल्याला ‘स्वराज्य’ हा शब्द दिला, तसेच स्वराज्याचा पाया घातला, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन जिल्हा, राज्य आणि देश यांची प्रगती होऊ शकते. त्यासाठी प्रशासनाने पावले उचलणे आवश्यक आहे. त्यांच्या जन्मस्थानाची अशी दुरवस्था असणे रत्नागिरीकरांना रुचणारे नाही. लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानाची ही दुरवस्था म्हणजे आपल्या त्यांच्याविषयीच्या जाणिवा बोथट झाल्याचे प्रतीक आहे. या बोथट झालेल्या जाणीवा आपल्याला धारदार करायला हव्यात. त्यासाठी लागणारे सहकार्य आम्ही हिंदु जनजागृती समितीला करू. आमचाही या लढ्यात सहभाग असेल.

क्षणचित्रे

१. पत्रकार परिषदेत लोकमान्य टिळक यांच्या जन्मस्थानाची झालेली दुरवस्था छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवण्यात आली.
२. या पत्रकार परिषदेला पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या विषयाकडे लक्ष वेधल्यासाठी पत्रकारांकडून समितीचे अभिनंदन करण्यात आले.
३. लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान रत्नागिरी येथे, शिक्षण पुणे आणि त्यांचे देहावसान मुंबई येथे झाले. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात येणारे हे जनआंदोलन रत्नागिरी, पुणे आणि मुंबई या ठिकाणी प्राथमिक टप्प्यात असणार आहे. या आंदोलनाविषयी, तसेच आंदोलनाच्या पुढील दिशेविषयी पत्रकारांनी प्रश्‍न विचारून माहिती जाणून घेतली.
४. याविषयी घेण्यात येणार्‍या ‘ट्विटर ट्रेंड’ विषयी श्री. मनोज खाडये यांनी माहिती दिली.