काश्मीरमधील हिंदूंच्या हत्या आणि सैनिकांचे हौतात्म्य यांच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक यांच्यातील ‘टी-२०’ क्रिकेट विश्वचषकातील सामना रहित करा ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे निवेदन

निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव (उजवीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, २१ ऑक्टोबर (वार्ता.) – जम्मू-काश्मीरमधील पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडून गेल्या काही दिवसांत हिंदू आणि शीख यांना लक्ष्य करत त्यांना ठार करण्यात आले. आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत ९ हून अधिक भारतीय सैनिक हुतात्मा झाले आहेत. काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या हिंदूंच्या नातेवाइकांनीही सामना रहित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे काश्मीरमधील हिंदूंच्या हत्या आणि सैनिक यांचे हौतात्म्य यांच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान यांच्यातील २४ ऑक्टोबर या दिवशी होणारा ‘टी-२०’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रहित करावा, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना २० ऑक्टोबर या दिवशी देण्यात आले.

या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. चंद्रकांत बराले, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. युवराज काटकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री शिवानंद स्वामी, बाबासाहेब भोपळे, दीपक कातवरे उपस्थित होते.