संभाजीनगर येथे एकच अभ्यास ३ वेळा विद्यार्थ्यांना शिकवावा लागत असल्याने शिक्षक त्रस्त !

पूर्ण क्षमतेने शाळा चालू करण्याची शिक्षकांची मागणी

संभाजीनगर – राज्यात शाळा चालू करण्यात आल्याने शिक्षण विभागाच्या नियमानुसार एकच अभ्यास विद्यार्थ्यांना ३ वेळा शिकवावा लागत असल्याने शिक्षक त्रस्त झाले आहेत.

१. शाळा चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र त्यामध्ये काही नियम लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये वर्ग मर्यादेच्या अर्ध्या क्षमतेने विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा. त्यामुळे एका वर्गातील विद्यार्थी एक दिवस अर्धे, तर दुसर्‍या दिवशी अर्धे, असे बोलवावे लागत आहेत.

२. जे विद्यार्थी शाळेत येत नाहीत, त्यांच्यासाठी ‘ऑनलाईन’ शिक्षणही चालू ठेवावे लागत आहे. यामुळे एकच अभ्यासक्रम ३ वेळा शिकवावा लागत असल्याने शिक्षकांना त्रास सहन करावा लागत आहे.

३. राज्य सरकारने शाळा चालू करण्याची अनुमती देत असतांना ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वीच्या, तर शहरी भागात इयत्ता ८ वी ते १२ वीच्या शाळांना अनुमती देण्यात आली आहे.

४. ‘या इयत्तेतील विद्यार्थ्यांसमवेत प्राथमिक शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शाळा चालू करणे अधिक आवश्यक आहे’, असे मत शिक्षक संघटनांनी व्यक्त केले आहे.