हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रत्येक भारतियाने  सैनिक झाले पाहिजे ! – आमदार टी. राजासिंह, भाग्यनगर

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हैद्राबाद  मुक्तीदिना’च्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ चर्चासत्राचे आयोजन

भाग्यनगर (तेलंगाणा) – निझामाच्या राजवटीमध्ये झालेल्या हिंदूंवरील आक्रमणांच्या खुणा आजही हैद्राबादमधील प्रत्येक गावामध्ये दिसून येतात. त्या वेळी आपले सैन्य अतिशय बलवान होते. प्रत्येक सैनिकामध्ये १०० लोकांशी लढण्याचे सामर्थ्य होते. त्याप्रमाणे आज भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी प्रत्येक भारतियाने एक सैनिक म्हणून सिद्ध झाले पाहिजे, असे प्रतिपादन गोशामहल (तेलंगाणा) येथील भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हैद्राबाद मुक्तीदिना’च्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या चर्चासत्रामध्ये ‘ऋषिजीवन समाज’चे संस्थापक अध्यक्ष श्री. मदन गुप्ता, ‘हिंदु जनशक्ती’चे संस्थापक अध्यक्ष श्री. ललित कुमार आणि हिंदु जनजागृती समितीचे आंध्रप्रदेश अन् तेलंगाणा राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी सहभाग घेतला.

पुन्हा रझाकाराची राजवट येऊ न देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – चेतन गाडी, आंध्रप्रदेश अन् तेलंगाणा राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

सध्या असलेली हिंदूंची स्थिती आणि रझाकाळातील हिंदूंची स्थिती यांत विशेष भेद नाही. रझाकाराच्या राजवटीत हिंदूंना गणेशोत्सव साजरा करण्याची अनुमती मिळत नव्हती आणि आजही तीच स्थिती आहे. काही दिवसांपूर्वी भाग्यनगरच्या काही भागांमध्ये प्रतिष्ठापना केलेल्या गणेशमूर्ती हटवण्यात आल्या. अशा प्रकारे अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन चालू राहिले, तर येणार्‍या काळात पुन्हा रझाकाराची राजवट येईल का ? अशी शंका येते. ते होऊ द्यायचे नसेल, तर भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे.

‘हैद्राबाद मुक्तीदिना’चा इतिहास

सौ. तेजस्वी वेंकटापूर

भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर निझामाच्या इच्छेप्रमाणे हैद्राबाद संस्थानचा समावेश पाकिस्तानमध्ये केला असता, तर देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असता. हे लक्षात घेऊन त्या वेळचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी १७ सप्टेंबर १९४८ या दिवशी हे संस्थान भारतात विलीन करून घेतले. तेव्हापासून हा दिवस ‘हैद्राबाद मुक्तीदिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे महत्त्व, हिंदूंचा त्याग आणि रझाकारांनी हिंदूंवर केलेले अत्याचार समाजापर्यंत पोचावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘ऑनलाईन’ चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन समितीच्या सौ. तेजस्वी वेंकटापूर यांनी केले.

स्वाभिमान नसलेले हिंदू मृतप्राय आहेत ! – ललित कुमार, संस्थापक अध्यक्ष, हिंदु जनशक्ती

भारताचे इस्लामीस्तान करण्यासाठी धर्मांध अखंड प्रयत्नरत आहेत.  इंग्रज, एम्.आय.एम्. आणि काँग्रेस हे तीन शत्रू नेहमी भारताचे तुकडे करण्याचा विचार करत असतात. हिंदूंमध्ये स्वाभिमान नसेल, तर ते जिवंत असूनही मृतप्राय आहेत. आज आपल्याला केवळ इतिहास शिकायचा नाही, तर इतिहास रचणार्‍या हिंदुवीरांविषयीही माहिती करून घ्यायची आहे, तसेच आपल्यामध्ये त्यांच्यासारखे वीरतेचे गुण निर्माण करायचे आहेत.

‘हिंदु-मुसलमान भाई-भाई’ म्हणणार्‍या हिंदूंना जागृत करणे  आवश्यक आहे ! – मदन गुप्ता, संस्थापक अध्यक्ष, ऋषिजीवन समाज

आम्हाला खर्‍या अर्थाने वर्ष २०१४ मध्ये (केंद्रामध्ये भाजपचे सरकार आले) स्वातंत्र्य मिळाले, असे म्हणणे चुकीचे होणार नाही; कारण तोपर्यंत परकीय मानसिकता ठेवणार्‍या (काँग्रेसचे सरकार असल्याने) लोकांनीच भारतावर राज्य केले आहे. रझाकारांनी घरातील लोकांच्या डोळ्यादेखत त्यांच्या महिलांवर अत्याचार केले होते. त्यांना विवस्त्र होऊन ‘बतुकम्मा’ (सांप्रदायिक नृत्य) करण्यास भाग पाडले होते. धर्मांधांचे ध्येय तेव्हाही स्पष्ट होते आणि आजही स्पष्ट आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षता जोपासणार्‍या आणि ‘हिंदु-मुसलमान भाई-भाई’ म्हणणार्‍या हिंदूंना जागृत करणे आवश्यक आहे.