कोकणात आपत्ती व्यवस्थापनासाठी ३ सहस्र २०० कोटी रुपयांची तरतूद

नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी हानी अल्प होण्यास साहाय्य होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – कोकणामध्ये कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय १५ सप्टेंबरला झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यामुळे कोकणात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी अल्प होण्यास साहाय्य होणार आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीवरील जिल्ह्यात झालेली हानी विचारात घेऊन ‘कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्प’ या नावाने कोकणासाठी हा विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत सुमारे ३ सहस्र २०० कोटी रुपयांपैकी २ सहस्र कोटी रुपये राज्य आपत्ती सौम्यीकरण निधीतून खर्च करण्यास आणि उर्वरित १ सहस्र २०० कोटी रुपये पुढील ४ वर्षांत राज्याच्या निधीतून उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी ४ वर्षांचा नियोजन आराखडा सिद्ध करण्यात येणार आहे. त्याच्या प्रभावी कार्यवाहीसाठी प्रकल्प संनियंत्रण गट आणि सल्लागार यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.