कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रभाव जाणवणार नाही !

  • आयआयटी कानपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. मणिंद्र अग्रवाल यांचा दावा

  • उत्तरप्रदेश, बिहार, देहली आणि मध्यप्रदेश यांसारखी राज्ये ऑक्टोबरपर्यंत कोरोनामुक्त होणार !

आयआयटी कानपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. मणिंद्र अग्रवाल

कानपूर (उत्तरप्रदेश) – आता कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता अगदीच नगण्य आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आल्याने तिसर्‍या लाटेचा प्रभाव जाणवणार नाही, असा दावा आयआयटी कानपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. मणिंद्र अग्रवाल यांनी गणितीय मॉडेलच्या आधारावर केला आहे.

१. पद्मश्री पुरस्कार विजेते प्रा. अग्रवाल म्हणाले की, कोरोनाच्या संसर्गाचा वेग आता न्यून होईल. तसेच ऑक्टोबर मासापर्यंत उत्तरप्रदेश, बिहार, देहली आणि मध्यप्रदेश यांसारखी राज्ये कोरोनाच्या संसर्गापासून मुक्त होतील.

२. प्रा. अग्रवाल यांना दावा केला आहे की, ऑक्टोबर मासापर्यंत देशातील कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या ही सुमारे १५ सहस्रांच्या आसपास राहील. त्याचे कारण आसाम, अरुणाचल प्रदेशसह पूर्वोत्तरेकडील राज्ये, तेलंगाणा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू राज्यांमध्ये संसर्ग असेल.

३. प्रा. मणिंद्र अग्रवाल यांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेविषयी केलेला दावा बर्‍यापैकी अचूक ठरला होता. प्रा. अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार दळणवळण बंदी आणि लसीकरण यांचा पुष्कळ लाभ झाला आहे.

कोरोनाची तिसरी लाट इतर २ लाटांपेक्षा सौम्य स्वरूपाची असेल ! – राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या तज्ञांची समिती

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या तज्ञांच्या समितीने कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर मासामध्ये उच्चांक गाठू शकते. या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका आहे. कितीही सर्तकता बाळगली तरीही कोरोनाची तिसरी लाट ही ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत येण्याची शक्यता आहेच; मात्र कोरोनाची तिसरी लाट ही इतर २ लाटांपेक्षा सौम्य स्वरूपाची असेल, असेही या समितीकडून सांगण्यात आले आहे.