शिर्डी साईबाबा संस्थान विश्वस्तांच्या निवडीला आणखी २ आठवड्यांची मुदत

साईबाबा मंदिर, शिर्डी

नगर, २८ जुलै – शिर्डी येथील साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची मुदत पूर्वीच संपली आहे. विश्वस्त मंडळासंबंधीच्या कायद्यात दुरुस्ती करूनही न्यायालयाने ठरवून दिलेल्या मुदतीत सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारकडून नव्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्यात आली नाही. याची अधिसूचना काढण्यासाठी आणखी २ आठवड्यांची मुदत देण्याची मागणी सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली. ती न्यायालयाने मान्य केली आहे; मात्र सरकारने केलेल्या दुरुस्तीवर आक्षेप घेणारी याचिका माजी विश्वस्त उत्तम शेळके यांनी केली आहे. संस्थानच्या अध्यक्षपदी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

या याचिकेची सुनावणी ३० जुलै या दिवशी होणार आहे. शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळ नेमणुकीच्या संदर्भात चुकीचा कारभार होऊ नये म्हणून राज्य सरकारने नियमावली सिद्ध केली; पण त्याचे पालन सरकार स्वत:च करीत नाही. विश्वस्तांच्या १६ पदांचे ३ पक्षांमध्ये राजकीय वाटप करण्यात आल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.