ढोरोशी (जिल्हा सातारा) येथील स्मशानभूमीची पावसामुळे वाताहत !

अंत्यविधीचा प्रश्न बनला गंभीर

स्मशानभूमीची पावसामुळे वाताहत

सातारा, १ जुलै (वार्ता.) – तीव्र पावसामुळे ढोरोशी गावाच्या स्मशानभूमीची वाताहत झाली आहे. पाण्याच्या प्रवाहाने अंत्यविधीच्या शेडसह अंत्यविधीच्या जागेचीही मोठी हानी झाली आहे. यामुळे अंत्यविधीचा प्रश्न गंभीर बनला असून संबंधितांनी याकडे तातडीने लक्ष देऊन दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत. (याची मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ? – संपादक)

ढोरोशी गावातून वहाणार्‍या नाल्यांनाही प्रचंड पाणी असते. हे पाणी स्मशानभूमीकडील ओढ्याला मिळते. हे पाणी स्मशानभूमीत घुसून हानी झाली आहे. पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे स्मशानभूमीचा पाया आणि रस्ता वाहून गेला आहे. यामुळे स्मशानभूमीची मोठी हानी झाली असून अशा स्थितीमध्ये अंत्यविधी करणे अशक्य असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.