कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात भरती झाल्यावर साधिकेला गुरुकृपेमुळे ईश्वरी अनुसंधानात रहाता येऊन रामनाथी आश्रमात असल्याची अनुभूती येणे

१. कोरोनाची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्याने आधुनिक वैद्यांनी रुग्णालयात भरती होण्यास सांगणे

‘२५.१.२०२१ या दिवशी संध्याकाळी ६ वाजता माझी एका रुग्णालयात कोरोनाची चाचणी करण्यात आली. तेथे मला ‘तुम्ही कोरोनाबाधित (पॉझिटिव्ह) आहात आणि तुम्हाला रुग्णालयात भरती व्हायला पाहिजे’, असे सांगितले. हे ऐकून माझे हातपाय गळून गेले. मी लगेच देवाचा धावा केला आणि मनाला सावरले. मी ‘हे कृष्णा, मला बळ दे’, अशी प्रार्थना केली. तेव्हा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप दिसले.

२. रुग्णालयात अनुभवलेली गुरुकृपा

२ अ. रुग्णालयात भरती झाल्यावर भीती वाटणे आणि नामजप आपोआप चालू होणे : मी घरी जाऊन १० – १२ दिवसांसाठी लागणारे कपडे घेऊन रात्री १० वाजता एका रुग्णालयात भरती झाले. तेथे आधुनिक वैद्यांनी माझी क्ष-किरण तपासणी, तसेच अन्य तपासण्या केल्या अन् मला रुग्णालयात भरती करून घेतले. माझी दिवसभर पुष्कळ धावपळ झाली होती. मला भीतीही वाटत होती आणि त्या वेळी माझा नामजप आपोआप चालू झाला. ‘ही गुरुमाऊलीची कृपा आहे’, असे वाटून माझी भावजागृती झाली आणि मला कृतज्ञता वाटली.

२ आ. रुग्णालयात १२ दिवस औषधोपचार चालू असतांना ‘रुग्णालयात नसून रामनाथी आश्रमातच आहे’, असे वाटणे : मला दुसर्‍या दिवसापासून सलग ५ दिवस ‘सलाईन’मधून ‘इंजेक्शन्स’ दिली जात होती. नंतर मला दुसरीकडे सुई टोचून ७ दिवस ‘इंजेक्शन्स’ दिली. मला मधुमेह असल्याने दिवसातून ४ वेळा पोटात आणि ४ वेळा हाताला सुई टोचत होते. मी १२ दिवस रुग्णालयात होते; पण ‘मी रामनाथी आश्रमातच आहे’, असे मला वाटत होते.

२ इ. रुग्णालयात आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांचे पुष्कळ प्रेम मिळणे अन् परिचारिका ‘इंजेक्शन’ घेऊन आल्यावर ‘कृष्ण, कृष्ण, कृष्ण’ असा नामजप चालू होणे : मला आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांचे पुष्कळ प्रेम मिळाले. परिचारिका ‘इंजेक्शन’ घेऊन आली की, माझा ‘कृष्ण, कृष्ण, कृष्ण’ असा नामजप चालू व्हायचा. परिचारिका मला विचारायची, ‘‘तुम्हाला दुखले का ?’’ तेव्हा मी सांगायचे, ‘‘नाही.’’ मी मनाला विचारायचे, ‘हे कशामुळे झाले ?’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘माझ्या गुरुमाऊलीच्या कृपेमुळे मला वेदना जाणवत नाहीत.’

– एक साधिका

गुरुमाऊली पाठीशी असता

भीती आम्हाला कशाची ?
सगेसोयरे दूर रहाती  ।
नातीगोती न कामी येती ।। १ ।।

आहे माझी गुरुमाऊली ।
नामासंगे अखंड जोडती ।
मग भीती आम्हा कशाची ।। २ ।।

‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी ।
आम्हा बळ द्यावे’, हीच प्रार्थना ईश्वरचरणी ।। ३ ।।

– एक साधिका (१३.३.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक