महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे सरकार हे लबाड सरकार अशी नोंद होईल !

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडे महत्त्वाची माहिती असल्याने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न !

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

मुंबई, १० मार्च (वार्ता.) – यंदांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात ठाकरे सरकार हे लबाड सरकार अशी नोंद होईल. या सरकारच्या विरोधात निश्‍चितच हक्कभंग आणणार आहे, असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी १० मार्च या दिवशी येथे केला. अर्थसंकल्पाचे अधिवेशन पार पडले. त्या वेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्याजवळ निश्‍चितच अशी महत्त्वाची माहिती आहे की, तो शासनाला हालवू शकतो आणि घालवूही शकतो. मनसुख यांच्या पत्नीने सचिन वाझे यांनी मनसुख यांचा खून केल्याचे सांगूनही वाझे यांच्यावर कारवाई होत नाही, असेही त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आम्हाला माहीत आहेे की, सी.डी.आर्. कसे आणले यापेक्षा मनसुख हिरेन यांची हत्या कुणी केली, हे पहाणे महत्त्वाचे आहे. वाझे यांच्या विरोधातील पुरावे देऊनही कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की, त्यांना वाचवले जात आहे. वाझे यांच्यासाठी अधिवक्त्यांची आवश्यकता नाही, कारण उद्धव ठाकरे हेच त्यांचे अधिवक्ता वाटतात.