बेळगाव सीमाप्रश्‍नावर केवळ प्रतीवर्षी विधीमंडळात बोलणे, ही तेथील मराठी बांधवांची चेष्टा ! – आमदार जयंत पाटील, शेकाप

आमदार जयंत पाटील

मुंबई, ५ मार्च (वार्ता.) – बेळगावमधील साडेतीन तालुक्यांचा मराठी भाषिकांचा भाग महाराष्ट्रात आला पाहिजे. न्यायालयात आणखी किती दिवस भांडणार ? बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात आला पाहिजे. पूर्वी अधिवेशनाच्या प्रारंभी सीमाप्रश्‍नावर बोलले जात असे. आता हा प्रश्‍न मागे पडला आहे. आता अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात बेळगाव सीमा भागातील समस्येवर बोलले जाते. बेळगाव सीमाप्रश्‍नावर केवळ प्रतीवर्षी विधीमंडळात बोलणे, ही तेथील मराठी बांधवांची चेष्टा आहे, अशी खंत शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी ३ मार्च या दिवशी विधान परिषदेत व्यक्त केली. ते राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत होते.