प्रा. महावीर श्रीश्रीमाळ यांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यामुळे स्वतःत जाणवलेले पालट !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणारे प्रा. महावीर श्रीश्रीमाळ यांनी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवून स्वत:त अनुभवलेले पालट येथे देत आहोत.

प्रा. महावीर श्रीश्रीमाळ

​‘२४.१२.२०२० या दिवशी माझी एका संतांची भेट झाली. तेव्हा त्यांनी साधकांना विचारले, ‘‘महावीरच्या तोंडवळ्यात पालट झाला आहे का ? आता तो सर्वांशी बोलतो का ?’’ तेव्हा मेघाताईंनी (कु. मेघा चव्हाण यांनी) सांगितले, ‘‘हो. अलीकडे दादा सर्वांशी बोलतात. आता त्यांचा इतरांना साहाय्य करण्याचा भाग वाढला आहे.’’ यावर त्या संतांनी ‘यावर तू कसे प्रयत्न केलेस ?’, असे मला विचारले. याविषयी माझ्या लक्षात आलेली सूत्रे श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

१. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ही मनाविरुद्ध असल्याने तेथे मनाचा संघर्ष अधिक होत असल्याने त्यासाठी संघर्ष करणे कठीण जाते’, असे व्यष्टी साधनेच्या आढावासेविका सौ. सुप्रिया माथूर यांनी सांगणे

वर्ष २०१८ च्या शेवटी मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत होतो. व्यष्टी साधनेच्या आढावासेविका सौ. सुप्रिया माथूर यांनी ‘तुम्ही स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना संघर्ष करण्यात न्यून पडता’, असे मला सांगितले. तेव्हा मी त्यांना म्हणालो, ‘‘उच्च शिक्षण घेणे, घरचे दुकान न सांभाळता नोकरी करणे अन् स्वपसंतीने विवाह ठरवणे’, यांविषयी निर्णय घेणे आणि नंतर पुढे साधना करण्यासाठी कुटुंबियांच्या समवेत संघर्ष करणे’, हे मला सहजपणे जमले; तर ‘आता स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेत संघर्ष करायला मन सिद्ध नाही’, असे कसे ?’’ यावर सुप्रियाताई मला म्हणाल्या, ‘‘मनाला अपेक्षित अशा गोष्टी मिळवण्यासाठी किंवा मनाला अनुकूल असे होण्यासाठी संघर्ष करतांना तुमच्या मनाने तुम्हाला साथ दिली. त्यामुळे तुम्ही उत्साहाने या प्रसंगांना सामोरे गेलात; मात्र स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रियाच मनाविरुद्ध असल्याने तेथे मनाचा संघर्ष अधिक होतो. त्यामुळे तुम्ही ती तितक्या सहजपणे आणि उत्साहाने करत नाही.’’

२. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना जाणवलेले पालट  

२ अ. एका साधकाने ‘महावीरशी बोलतांना ताण येतो’, असे लक्षात आणून दिल्यावर कृतज्ञता वाटणे : एका साधकाने ‘महावीरशी बोलतांना ताण येतो’, असे कळवले होते. तेव्हा ‘अन्य साधकांनाही माझ्या स्वभावदोषांमुळे ताण येत असेल; पण ते सांगू शकले नसतील’, असे माझ्या लक्षात आले. त्या साधकाने माझा हा स्वभावदोष माझ्या लक्षात आणून दिल्याविषयी मला त्यांच्याविषयी कृतज्ञता वाटली.

२ आ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एकेका साधकाला त्याच्यातील काही उत्तम गुण हेरून येथे आणले आहे, त्यामुळे साधकांविषयी प्रतिक्रिया देणे अयोग्य आहे’, या विचाराने स्वभावदोष न्यून होणे : पूर्वी साधकांनी अडचण विचारल्यानंतर त्यांना साहाय्य करतांना मला प्रतिक्रिया यायच्या. ‘पूर्वग्रह आणि ‘मला कळते’, हे स्वभावदोष अन् अहं उफाळून येऊन माझ्या मनात प्रतिक्रिया यायच्या. माझ्याकडून त्या व्यक्तही केल्या जायच्या. अजूनही काही वेळा असे विचार माझ्या मनात येतात; मात्र ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी एकेका साधकाला त्याच्यातील गुणांमुळे आपलेसे केले आहे’, या विचारांनी ‘अशा साधकांवर अधिकार गाजवणे किंवा प्रतिक्रिया देणे’, याचा मला अधिकार तरी आहे का ?’, असा विचार होऊन ‘साधकांविषयी प्रतिक्रिया येणे, अधिकारवाणी, पूर्वग्रह’ हे स्वभावदोष न्यून होऊ लागले आहेत.

​या स्वभावदोषांवर स्वयंसूचना देऊन होणार्‍या लाभापेक्षा ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी एकेका साधकाला त्याच्यामधील गुणांना हेरून आपलेसे केले आहे,’ या विचाराने माझ्या मनातील स्वभावदोष आणि अहं यांचे विचार न्यून होत होते. मला या विचारांचाच अधिक लाभ झाला.

२ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी केवळ बोलण्यापेक्षा ‘इतर संतांनी श्री गुरूंचे मन कसे जिंकले ? त्यांचा श्री गुरूंप्रती असलेला समर्पणाचा भाव’, यांविषयी मनात विचार येणे : प्रसार समन्वय सेवा करतांना ‘प्रसारातील संत, सद्गुरु आणि काही साधक यांच्याशी माझा संपर्क होतो. तेव्हा संत आणि साधक मला म्हणतात, ‘‘तुम्ही भाग्यवान आहात. साक्षात् वैकुंठात गुरुदेवांच्या कृपाछत्राखाली साधनारत आहात. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरांना भेटावे किंवा त्यांच्याशी बोलावे’, हा विचार माझ्या मनात येण्यापेक्षा ‘प्रसार आणि आश्रम यातील संत अन् सद्गुरु यांनी परात्पर गुरु डॉक्टरांचे मन कसे जिंकले आहे ? त्यांनी स्वतःला त्यांच्याप्रती कसे समर्पित केले आहे ?’, हा विचार माझ्या मनात येतो. ‘मला तसे परात्पर गुरु डॉक्टरांचे मन जिंकता येईल का ? स्वतःला त्यांच्या चरणी समर्पित करता येईल का ? यासाठी मी काय प्रयत्न करायला हवे किंवा मी कुठे न्यून पडतो ?’, असे विचार माझ्या मनात येऊन गुरुदेवांना भेटण्याचा विचार मनात रहात नाही.

२ ई. सहसाधकांप्रमाणे ‘जाणूनी श्री गुरूंचे मनोगत’ याप्रमाणे सेवा करावी’, असे वाटू लागणे : सहसाधक जसे ‘जाणूनी श्री गुरूंचे मनोगत’, सेवा करतात’, तसे प्रयत्न करायला हवेत. तसे प्रयत्न केल्याने ‘गुरुतत्त्वाची सेवा घडेल’, असे आता वाटू लागले आहे. आता मोक्षप्राप्तीच्या विचारांपेक्षा ‘सदैव गुरुतत्त्वाशी एकरूप होता येऊ दे’, अशी प्रार्थना होते.

२ उ. ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ हे साधकांना साधनेत कसे साहाय्य करतात ?’, यांविषयीचे विचार वाढून मनातील राष्ट्र, धर्म आणि समाजसाहाय्य यांविषयीचे विचार न्यून होणे : वर्ष १९९५ च्या अखेरीस मला साधना समजली आणि वर्ष १९९९ नंतर मी सेवा करू लागलो. त्यानंतर मी आश्रमात पूर्णवेळ साधनेसाठी आलो. तेव्हा माझ्या मनात राष्ट्र, धर्म आणि समाजसाहाय्य यांचे विचार अधिक प्रमाणात असायचे. साधनेच्या आढाव्याच्या निमित्ताने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी संपर्क आल्यानंतर विशेषत: दळणवळण बंदीच्या काळात मार्च २०२० पासून राष्ट्र, धर्म अन् समाजसाहाय्य या विचारांपेक्षा साधक आणि साधना यांविषयीचे विचार वाढू लागले. परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ हे ‘आम्हा साधकांची काळजी कशी घेतात ? आमच्या साधनेतील अडचणी कशा दूर करतात ? आम्हाला साधनेत कसे साहाय्य करतात आणि आम्हाला मोक्षप्राप्तीसाठी कसे मार्गदर्शन करतात ?’, या विचारांचे प्रमाण वाढून तुलनेने राष्ट्र, धर्म आणि समाजसाहाय्य यांचे विचार न्यून झाले.

२ ऊ. समष्टी सेवेविषयी तळमळ वाढल्यामुळे आपत्काळाविषयीच्या सूचना प्रथम नातेवाइकांना न पाठवता साधकांना पाठवणे : ‘संभाव्य आपत्काळात साधकांनी काय काळजी घ्यावी ?’, या संदर्भात सूचना दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाल्या. त्या वेळी या सूचना नातेवाइकांना पाठवूया’, असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा प्रथम समष्टी सेवा पूर्ण करून, म्हणजेच ‘आधी या सूचना सर्व साधकांपर्यंत पोचवूया. त्यानंतर नातेवाइकांना या सूचना पाठवूया’, या विचाराने मी दिवसभर सेवा करत राहिलो.

२ ए. सेवा संपल्यावर या सूचना नातेवाइकांना पाठवणे; पण नातेवाइकांचा काही प्रतिसाद नसल्याचे पाहूनही शांत रहाता येणे : सायंकाळी उशिरा नातेवाइकांच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ गटात दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेली सूचना पाठवली. ‘नातेवाइकांपैकी ४ जणांशी याविषयी बोलू शकतो’, या विचाराने त्यांना संदेश पाठवून आठवण केली; मात्र या सूचनांना त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा ‘आपण आपले कर्तव्य केले. बाकी देव पाहून घेईल’, या विचाराने शांत आणि स्थिर रहाता आले.

३. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘तुम्ही व्यक्त भावाकडून अव्यक्त भावाकडे जात आहात, श्री गुरूंना अपेक्षित असे करण्याचा प्रयत्न करा’, असे मोलाचे मार्गदर्शन करणे

​आश्रमात येण्यापूर्वी मी प्रसारात सेवा करायचो. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांविषयी भाव दाटून येऊन माझी भावजागृती व्हायची. ‘तसे आता का होत नाही ? माझे भावजागृतीचे प्रयत्न न्यून होतात का ?’, असा विचार (सप्टेंबर २०२० मध्ये) माझ्या मनात आला. मी हे विचार श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगितले. त्यावर मार्गदर्शन करतांना त्या म्हणाल्या, ‘‘पूर्वी व्यक्त होणारा भाव हा व्यष्टी भाव होता. त्या भावाकडून अव्यक्त म्हणजे समष्टी भावाकडे तुम्ही जात आहात, व्यापक होत आहात, हे महत्त्वाचे आहे. ‘श्री गुरूंना अपेक्षित असा विचार करायला आणि त्याप्रमाणे प्रयत्न करायला आपण कुठे न्यून पडतो ?’, हा विचार करून अधिकाधिक व्यापक होण्यासाठी प्रयत्न करा. ‘ईश्‍वराशी एकरूप होणे’, हा भावाच्या पुढचा टप्पा आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करू शकता.’’

४. कृपासिंधू परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती वाटलेली कृतज्ञता !

४ अ. वृद्ध आई-वडिलांना कोरोनापासून काळजी घेण्याविषयी सूचना सांगूनही ते फारशी काळजी घेत नसणे : कोरोना महामारीच्या काळात ‘कोरोनापासून साधकांनी कशी काळजी घ्यावी ? तो होऊ नये; म्हणून काय प्रयत्न करावेत ?’, अशा सूचना साधकांना देण्याची सेवा मला देण्यात आली होती. ही सेवा करतांना ‘गावी घरी दुकान सांभाळणारे ७३ वर्षांचे वडील आणि ७० वर्षांची आई हे दोघे त्याविषयी काळजी घेतात का ?’, असा विचार माझ्या मनात आला. तेव्हा मी त्यांना काळजी घेण्याच्या सर्वसाधारण सूचना सांगितल्या. भावाशी भ्रमणभाषवर बोलतांना त्याने सांगितले, ‘‘आई-वडील कोरोनाच्या दृष्टीने काळजी घेत नाहीत.’’ त्यामुळे भावाला चिंता वाटत होती. तेव्हा मी त्याला सांगितले, ‘‘आई-वडील जेवढे ऐकतात, तेवढे सांगूया.’’

४ आ. आई-वडिलांना अनेक आजार असूनही त्यांना कोरोनाची लागण न होणे आणि याविषयी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटून आई-वडिलांच्या प्रकृतीची चिंता न वाटणे : माझ्या आईला मधुमेह, रक्तदाब, ‘थायरॉईड’ असे बहुविध आजार (co morbidities) आहेत आणि वडिलांना श्‍वसनाचा त्रास, धुळीची ‘अ‍ॅलर्जी’ आहे. असे असूनही गुरुकृपेनेच त्यांना कोरोनाची लागण झाली नाही. खरेतर या काळात दुकानाच्या आजूबाजूला रहात असलेल्या तरुणांनाही कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘राम हमारा काम करे, हम बैठे आराम !’ आम्ही साधकांनी साधना करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी गुरु आणि ईश्‍वर आमची सर्व काळजी घेतात आणि आमच्या समस्यांचे निराकरण करतात. या विचाराने आई-बाबांच्या प्रकृतीविषयी मला काळजी वाटली नाही आणि माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.

५. प्रार्थना आणि कृतज्ञता

​‘गुरुमाऊलीनेच साधनेला पूरक विचार सुचवून त्यांच्याशी मानस बोलण्याचा भाग करवून घेतला. मला साधनेत टिकवून ठेवले. ते समवेत असल्याची अनुभूतीही मला दिली’, याविषयी त्यांच्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञता !  ‘हे गुरुदेवा, केवळ याच जन्मात नव्हे, तर ईश्‍वरेच्छेने माझा पुन्हा जन्म होणार असेल, तर त्या वेळीही आपली अगाध कृपा माझ्यावर सदोदित रहावी, अन्य काही नको’, हीच आपल्या पावन चरणी शरणागतभावाने प्रार्थना !’

– प्रा. महावीर श्रीश्रीमाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  (२१.१.२०२१)

व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे आणि सेवेची तळमळ असणारे प्रा. महावीर श्रीश्रीमाळ !

१. ‘महावीरदादांचा स्वभाव पुष्कळ प्रेमळ आणि मनमिळाऊ आहे.

२. ते प्रत्येकच कृती आणि सेवा परिपूर्ण अन् व्यवस्थित करतात.

३. इतरांना साहाय्य करणे

​दादा समष्टीशी संबंधित सेवा करतात, तरी मला कधीही काही साहाय्य लागले, तर ते तत्परतेने साहाय्य करतात.

४. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

​त्यांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया पुष्कळ छान राबवली. ते त्यांच्याकडून झालेल्या चुका सहसाधकांना विचारतात आणि त्यांच्या लक्षात आलेल्या स्वतःच्या चुका सेवेच्या ठिकाणी सांगतात. त्याच समवेत ते अत्तर आणि कापूर यांचे उपाय, सारणी लिखाण, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन या कृती नियमित करतात.

​दादांकडे काही वेळा समन्वयाच्या सेवा असतात. त्या वेळी त्यांंच्याकडून काही चुका झाल्या, तर ते लगेच स्वतःहून त्यासाठी प्रायश्‍चित्त घेतात.

५. स्वीकारण्याची वृत्ती

​ते त्यांना सांगितलेली कुठलीही गोष्ट किंवा चुका पटकन स्वीकारतात.

६. तत्त्वनिष्ठता

​एखाद्या प्रसंगात कुणाचे काही चुकले असेल, तर ते तेवढ्याच तत्त्वनिष्ठेने त्यांना चुका सांगतात. त्यामुळे ‘साधकांनी तसे प्रयत्न केल्यास साधकांची साधनेत प्रगती होईल’, असा भाव त्यांच्या मनात असतो.

७. सेवेची तळमळ

अ. एकदा आश्रमात एक प्रसंग झाला असतांना दादांनी स्वतः पूर्ण रात्र जागून त्याविषयीची सर्व सेवा पूर्ण केली, तरी दुसर्‍या दिवशीही ते वेळेत सेवेला आले.

आ. ‘त्यांना एकदा सेवा सांगितली की, ती पूर्ण होणारच’, असा विश्‍वास त्यांनी संपादन केला आहे. संत आणि सद्गुरु यांचाही विश्‍वास त्यांनी मिळवला आहे. काही सेवांविषयी ‘महावीरदादा या सेवा बघतील’, असेही संत म्हणतात.

८. त्यांच्यामध्ये पुष्कळ शरणागतभाव आहे.

९. ‘त्यांचा अहंही अल्प होत आहे’, असे जाणवते.’

– कु. अमृता मुद्गल (वय १७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.२.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक