‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने आयोजित केलेल्या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी  कु. अ‍ॅना पी यांना आलेल्या अनुभूती

‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने आयोजित केलेल्या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी पू. देयान ग्लेश्‍चिच संतपदी विराजमान झाल्यावर कु. अ‍ॅना पी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

पू. देयान ग्लेश्‍चिच

१. ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने आयोजित केलेल्या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात ‘काहीतरी महान आणि महत्त्वाचे घडले आहे, ज्यामुळे विदेशातील साधकांच्या साधनेला चालना मिळेल’, असे वाटणे

कु. अ‍ॅना पी

‘३.१.२०२० या दिवशी ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने आयोजित केलेल्या शिबिराचे उद्घाटन झाल्यावर माझ्या मनात पू. देयान ग्लेश्‍चिच आणि अन्य साधक यांच्याविषयी अपार कृतज्ञता दाटून आली. या कृतज्ञतेमुळेच काही वर्षांनंतर मला या कार्यक्रमामध्ये आलेल्या अनुभूती लिहून देण्याची प्रेरणा मिळाली. ‘या कार्यक्रमात काहीतरी महान आणि महत्त्वाचे घडले आहे, ज्यामुळे विदेशातील साधकांच्या साधनेला चालना मिळेल’, असे मला वाटले. देवाच्या कृपेने अन्य साधकांप्रमाणेच मलाही गेल्या १० वर्षांत अनेक साधक संत म्हणून घोषित झाल्याचे सोहळे पहाण्याचे भाग्य लाभले; मात्र पू. देयानदादांना संत घोषित केल्याचा हा सोहळा पुष्कळ विशेष होता.

२. पू. देयानदादांना संत घोषित केल्यावर भावजागृती होणे आणि त्यांच्याकडून ‘इतरांप्रती आदर कसा असावा ?’, ‘शिकण्याची वृत्ती’ आणि ‘निरीक्षण कसे करावे ?’, हे शिकायला मिळणे

पू. देयानदादांना संत घोषित केल्यावर माझी भावजागृती झाली. मला त्या भावस्थितीतच रहाण्याचा मोह होत होता; मात्र तेथे उपस्थित साधक पू. देयानदादांची गुणवैशिष्ट्ये सांगत असतांना त्या साधकांकडून शिकण्यापासून मी स्वतःला परावृत्त करू शकले नाही. साधक व्यासपिठावर येऊन पू. देयानदादांविषयी बोलत होते. त्यानंतर पू. देयानदादा त्या प्रत्येक साधकाकडून त्यांना ‘काय शिकायला मिळाले ?’, हे उपस्थितांना सांगत होते. पुष्कळ साधकांना पू. देयानदादांविषयी बोलायचे असल्याने हे सत्र पुष्कळ काळ चालले असले, तरी ‘ते संपूच नये’, असे मला वाटत होते. या सत्रातून पू. देयानदादांनी आम्हाला ‘इतरांप्रती आदर कसा असावा ?’, शिकण्याची वृत्ती’ आणि ‘निरीक्षण कसे करावे ?’, हे कृतीच्या स्तरावर आणि पारदर्शकतेने दाखवून दिले. त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गावरून चालल्यास साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा पाया अधिक मजबूत होईल, तसेच साधक करत असलेल्या समष्टी कार्याचा स्तर उंचावेल.

३. पू. देयानदादांनी साधकांचे लक्ष स्वतःकडे केंद्रित न ठेवता ते अन्य साधकांकडे वळवत असल्याने साधकांना पू. देयानदादांविषयी मनोगत व्यक्त करण्याचा आनंद होणे

हा कार्यक्रम मुख्यत्वे पू. देयानदादांविषयी होता, म्हणजे ते या कार्यक्रमाचे केंद्रस्थान होते. प्रत्यक्षात मात्र ते स्वतःकडे लक्ष केंद्रित न ठेवता नकळतपणे अन्य साधकांकडे वळवत होते. त्यामुळे ‘जे साधक पू. देयानदादांविषयी बोलले, त्यांना स्वतःचे मनोगत व्यक्त करण्याचा आनंद होणे आणि पू. देयानदादांनी त्यांच्याविषयी केलेल्या निरीक्षणाच्या माध्यमातून त्यांचा आशीर्वाद मिळणे’, असा दुहेरी लाभ झाला. या कृतीतून पू. दादांनी ‘स्वतःचे अस्तित्व आणि संतपद यांपेक्षा त्यांना साधक महत्त्वाचे आहेत’, हेे दाखवून दिले. त्यांच्या या निःस्वार्थ आचरणातून आम्हा साधकांना पुष्कळ काही शिकायला मिळाले.

४. पू. देयानदादांमधील गुणांमुळे ‘ते ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे कार्य समर्थपणे चालवतील’, असा विश्‍वास वाटणे

या कार्यक्रमाला उपस्थित संत आणि साधक यांनी पू. देयानदादांची गुणवैशिष्ट्ये सांगितली. पू. दादांमध्ये अनेक गुणांचा संगम आहे, जो क्वचितच एखाद्यामध्ये आढळतो. या गुणांमुळेच पू. देयानदादांना अध्यात्मातील असो वा व्यवहारातील ज्ञात-अज्ञात अशा प्रत्येक परिस्थितीशी अगदी सहजतेने जुळवून घेता आले. ‘पू. देयानदादांमधील गुणांमुळे ते ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे कार्य समर्थपणे चालवतील’, असा विश्‍वास प्रत्येक साधकाच्या मनात निर्माण झाला. एखाद्या साधकाला काही वेळा त्याच्या चांगल्या आध्यात्मिक पातळीमुळे, तर काही वेळा ‘त्या सेवेतून त्या साधकाची आध्यात्मिक प्रगती व्हावी’, या हेतूने एखादी महत्त्वाची सेवा (दायित्व) दिली जाते. पू. देयानदादांच्या संदर्भात त्यांच्याकडे असणार्‍या सेवांचे दायित्व आणि त्यांची आध्यात्मिक पातळी हे अत्यंत सुसंगत आहे. त्यामुळे आता ‘विदेशात चालू असलेल्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याची गती पुष्कळ वाढणार आहे’, असे मला वाटते.

५. पू. देयानदादांचे साधनाप्रवासातील अनुभव ऐकून साधिकेची साधना करण्याची तळमळ वाढणे आणि तिला कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे धैर्य प्राप्त होणे

पू. देयानदादांनी स्वतःचा साधनाप्रवास सांगतांना त्यांना ज्या काही प्रसंगांना सामोरे जावे लागले, ते सर्व प्रसंग अगदी प्रांजळपणे सांगितले. ‘त्यांना साधना करतांना प्रसंगी सहन करावे लागलेले दुःख आणि आलेली निराशा’, यांविषयी त्यांनी मनमोकळेपणाने सांगितल्यामुळे आम्हा साधकांनाही आमच्या साधनेत येणारे चढ-उतार लक्षात आले.

पू. देयानदादांनी साधना करतांना आलेल्या कठीण प्रसंगांतून त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे सांगितली. ती ऐकून माझी साधना करण्याची तळमळ वाढली आणि मला कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे धैर्य प्राप्त झाले. यासाठी मी पू. देयानदादांप्रती कृतज्ञ आहे.

६. ‘पू. देयानदादांच्या मार्गदर्शनाखाली विदेशात अध्यात्मप्रसाराचे कार्य जलद गतीने वाढेल’, याचा आनंद होणे

पुष्कळदा शिबिराचा उद्घाटन सोहळा होण्याआधी सर्व साधकांमध्ये ‘कोण ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठणार ?’ किंवा ‘कोण संत होणार ?’, यांविषयी उत्सुकता असते. या वेळीही मला काही प्रमाणात तशी उत्सुकता होती; परंतु कार्यक्रमात जे गुपित उलगडले, ते ऐकून मला अत्यानंद झाला. ‘पू. देयानदादांच्या मार्गदर्शनाखाली विदेशात अध्यात्मप्रसाराचे कार्य आता जलद गतीने वाढेल’, याविषयी मला उत्सुकता आणि आनंद वाटू लागला.

नम्रतेने आणि प्रेमभावाने साहाय्य करून नवीन संतांना घडवणारे सर्व सद्गुरु आणि संत यांच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. अ‍ॅना पी., युरोप (३.१.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक