सनातन संस्थेच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !

‘सिंध-हिंद’चा (आता पाकिस्तानमध्ये असलेल्या राज्याचा) सर्वांत प्राचीन आश्रम असलेला ‘शदाणी दरबार’, म्हणजे भारत-पाकिस्तानमधील सिंधी समाजाच्या हिंदूंचे श्रद्धास्थान ! या पिठाच्या पंचम पीठाधीश्वर प.पू. माता साहिब हासीदेवीजी यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त रायपूर (छत्तीसगड) येथे १७ मे ते २९ जुलै २०२६ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या ७० दिवसांच्या कार्यक्रमात प्रत्येक दिवशी भारत आणि पाकिस्तान येथील भाविक सहस्रोंच्या संख्येने शदाणी दरबार येथे येत आहेत.

या दरबाराचे विद्यमान नवम पीठाधीश्वर प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराजांच्या आमंत्रणावरून सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या २० आणि २१ जुलै २०२६ या दिवशी शदाणी दरबार येथील कार्यक्रमात उपस्थित होत्या. २० जुलै या दिवशी त्यांनी नारीशक्ती संमेलनात, तर २१ जुलै या दिवशी प्रत्यक्ष शदाणी दरबारात भाविकांना मार्गदर्शन केले, तसेच छत्तीसगडमध्ये सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून धर्मकार्य करणारे धर्मप्रेमी यांनाही आध्यात्मिक दिशा देणारे मार्गदर्शन केले. या दौर्‍यामध्ये विविध उद्योगपती, प्रतिष्ठित आणि राजकीय नेतृत्वाला भेटण्यासाठी त्यांनी वेळ दिला. अवघ्या दीड दिवसाचा उत्तराधिकारीद्वयींचा हा दौरा पूर्णतः ईश्वर नियोजित असण्याचाच अनुभव देणारा ठरला.

प.पू. माता साहिब हासीदेवीजी यांच्या प्रतिमेला वंदन करतांना डावीकडून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. उत्तराधिकारीद्वयींच्या मार्गदर्शनाच्या वेळी भाविकांना संतवाणीचा प्रभाव जाणवणे

नारीशक्ती संमेलनात प्रारंभी श्रोते आपापसांत चर्चा करत होते; परंतु श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी बोलण्यास प्रारंभ करताच संपूर्ण वातावरणात प्रचंड प्रमाणात चैतन्य पसरले. सर्व श्रोते शांत अन् अंतर्मुख होऊन विषय ऐकू लागले आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देऊ लागले. एखादी टाचणी पडली, तरी तिचा आवाज होईल, एवढी शांतता निर्माण झाली. संतवाणीचा आणि त्यांच्या अस्तित्वाचा समाजावर कसा सकारात्मक प्रभाव पडतो, हे या वेळी प्रत्यक्ष अनुभवायला मिळाले.

२. प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज यांच्या धर्मपत्नी पू. (सौ.) दीपिकादीदी यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

पू. (सौ.) दीपिकादीदी यांनी २१ जुलै या दिवशी शदाणी दरबारामध्ये मनोगत व्यक्त करतांना सांगितले, ‘‘दोन्ही गुरुमातांची वाणी अतिशय मधुर, सरळ आणि सोपी आहे. ती ऐकून मी स्वतः अतिशय प्रभावित झाले. म्हणूनच आज पुन्हा या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी मी आले आहे. त्यांच्या वाणीचा प्रभाव सर्व श्रोत्यांवर आणि साधकांवर स्पष्टपणे जाणवतो.’’ त्यांनी शेवटी विनंती केली, ‘‘आपण पुन्हा पुन्हा येथे आगमन करून आम्हा सर्वांना कृतार्थ करावे.’’

अखिल सिंधी समाजाला सनातन संस्थेशी जोडणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !

सद्गुरुद्वयींचे स्वागत करतांना प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज, पू. (सौ.) दीपिकादीदी आणि बाजूला श्री. सुनील घनवट

‘सनातन संस्था’ आणि ‘शदाणी दरबार’, म्हणजे सनातन धर्मियांवर सनातन संस्कार करणारी धर्मपिठे आहेत. राजीम कुंभमेळ्यापासून, म्हणेज वर्ष २०१३ पासून गत १३ वर्षांपासून या दोन्ही आध्यात्मिक संस्थांमध्ये जे धर्मबंधुत्वाचे निर्माण झाले आहे, ते अभूतपूर्व आहे. प्रयाग, हरिद्वार, राजीम येथील कुंभमेळा, गोवा येथे होणारे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव, देहली येथील शंखनाद महोत्सव, तसेच छत्तीसगडमध्ये होणारे हिंदु राष्ट्र अधिवेशन यांमध्ये दोन्ही संस्था वारंवार एकत्रित येऊन धर्मरक्षणाचे कार्य करत आहेत. याच धर्मबंधुत्वाच्या नात्यातून शदाणी दरबारचे नवम पीठाधीश्वर प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज यांनी सनातन संस्थेच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना छत्तीसगड येथे आमंत्रित केले होते. या सद्गुरुद्वयींचा दौरा अखिल सिंधी समाजाला सनातन संस्थेशी जोडणारा ठरला.

३. मार्गदर्शनामुळे प्रभावित झालेली सिंधी समाजातील प्रतिष्ठित मंडळी भेटण्यासाठी गोळा होणे

नारीशक्ती संमेलनानंतर सद्गुरुद्वयींच्या मार्गदर्शनाने प्रभावित झालेले उद्योगपती, संत आणि प्रतिष्ठित मंडळी त्या दोघींना भेटण्यासाठी आले होते. जुनागड येथील एका संतांनी त्यांच्या परिसरात अशाच प्रकारचे मार्गदर्शन करण्यासाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना आमंत्रित केले. पाकिस्तानमधून आलेल्या एका उद्योगपतींनी ‘पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हिंदूंना मार्गदर्शन करण्यासाठी यावे’, असे श्रद्धापूर्वक आमंत्रित केले. पाकिस्तानमधील काही उद्योगपतींनी ‘तेथील तीर्थक्षेत्रे आणि शक्तिपीठे यांचे दर्शन घडवण्यासाठी पूर्ण साहाय्य करू’, असे आश्वासनही सद्गुरुद्वयींना दिले. दोन दिवसांच्या कार्यक्रमात सिंधी समाजातील अनेक प्रतिष्ठित मंडळींनी संस्थेचे कार्य श्रद्धेने जाणून घेतले, तसेच गोव्यात येऊन आश्रम पहाण्याची इच्छा दर्शवली.

सनातन संस्था आणि तिच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी सद्गुरुद्वयींचे मार्गदर्शन यांविषयी प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज यांचे गौरवाद्गार !

प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराज

१. सनातन संस्थेविषयी गौरवोद्गार

सनातन संस्थेचे मुख्यालय गोव्यात असून देशभर संस्था कार्यरत आहेत. सनातन संस्थेचा मुख्य उद्देश आपल्या वैदिक सभ्यता, भारतीय संस्कार आणि गुरुपरंपरा यांना प्रसारित करणे, हा आहे. संपूर्ण जगात भारताला आध्यात्मिकदृष्ट्या श्रेष्ठ बनवण्याच्या आणि दिव्य विचारांचा प्रचार करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी या संस्थेची स्थापना केली. ही एक अद्भुत संस्था आहे, जिथे साधकांना आध्यात्मिक उन्नती केल्यानंतर संत आणि सद्गुरु असे म्हटले जाते. खर्‍या अर्थाने हीच आपली ऋषि परंपरा आहे, जी समर्पित लोकांना धर्माचे रक्षक म्हणून पुढे आणते !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याविषयी गौरवोद्गार !

प.पू. माता साहिब हासीदेवीजी यांच्या २०० व्या जयंती महोत्सवानिमित्त भारताची एक महत्त्वाची संस्था असलेल्या सनातन संस्थेच्या गुरुमातांना आमंत्रित करण्याची प्रेरणा मिळाली.

अ. सनातन संस्थेच्या आज गुरुमाता आल्या आहेत. त्यांचे मार्गदर्शन तुम्ही सर्वांनी ऐकले आहे. त्यांच्याकडे तुम्ही पहा. त्यांचे दर्शन घ्या ! त्यांच्याविषयी मला एक संस्कृत भाषेत एक रचना स्फुरली, ती वाचून दाखवतो. ‘अति सरला, अति मृदुला, गृह कुशला । सा अतुला, मम माता देवता ।।’ (अर्थ : त्या अत्यंत साध्या आणि सरळ स्वभावाच्या आहेत, त्या अतिशय कोमल (मृदू) आहेत, त्या गृहकार्यात अत्यंत कुशल आहेत, त्या अतुलनीय आहेत (त्यांची कुणाशीही तुलना होऊ शकत नाही), अशा माझ्या माता, हीच माझी देवता आहे.)

आ. सनातन संस्थेच्या गुरुमातांनी सनातन धर्माच्या व्यावहारिक पैलूंना अतिशय कुशलतेने मांडले आहे. भारतीय नारीच्या स्वरूपाला देवीच्या रूपात मांडण्याची यांची जी अतिशय भावपूर्ण आणि अतीमधुर सांगण्याची पद्धत आहे, ती ऐकतांना वाटत होते, जणू एखादी देवी बोलत आहे, साक्षात् देवी उपदेश करत आहे. आपल्या मुलांना समजावत आहे.

इ. एक सच्चिदानंद अवस्थेतील डॉ. आठवलेजी गोव्यात आहेत आणि तुम्ही त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी आहात, ‘सत्’ आणि ‘चित्’. तुम्ही सत्यरूपा, शक्ती-ज्ञानरूपा, सरस्वतीसमान, मधुर बोलणार्‍या मातेसमान, उपदेश देणार्‍या संत स्वभावाच्या, सकारात्मक ऊर्जा देणार्‍या, शिक्षिकेसमान, शक्तीसमानही, देवीसमानही ! जसे यांचे नाव गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) नाव दिले आहे. तसाच पेहराव, तसाच स्वभाव, तसेच आकर्षण, तसेच ममतेचे दिव्य रूप ! आम्ही स्वतःला धन्य समजतो की, या नारीशक्ती संमेलनात आम्ही आपल्या भारतीय स्वरूपातील गुरुमातांना येथे बोलावले आहे.

श्री. चेतन राजहंस

४. ‘सनातन संस्था’ आणि ‘शदाणी दरबार’ एकच परिवार असल्याची अनुभूती

दोन्ही सद्गुरुद्वयींचा शदाणी दरबारामधील हा पहिलाच दौरा होता; परंतु प.पू. डॉ. युधिष्ठिरलाल महाराजांचे शिष्य श्री. बंटी छाबडा, श्री. सुमित चावला, श्री. अमर शदाणी आणि अन्य सहकारी यांनी अत्यंत भावपूर्ण रितीने सेवा केली. ‘हे आपल्याच परिवारातील संत आहेत’, या भावाने त्यांनी फलाहार देणे, चरणांशी बसून छायाचित्र काढणे आणि मनमोकळेपणाने संभाषण करणे, या सर्व सेवा अत्यंत जवळीकतेने अन् अंतःकरणापासून केल्या. सर्व भाविकांच्या बोलण्यात एक वाक्य सारखे होते ते, म्हणजे ‘आम्ही प्रथमच भेटत आहोत, असे वाटतच नाही. आपली अनेक वेळा भेट झाली आहे. आपल्या बोलण्यातून आणि आचरणातून सनातन संस्था अन् शदाणी दरबार एकच परिवार आहे, याची आम्ही प्रत्यक्ष अनुभूती घेत आहोत.’

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक