(म्हणे) ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए !’ – अभिजित दीपके

धर्मेंद्र प्रधान यांच्या त्यागपत्रावर अभिजित दीपके यांचे अहंकारी विधान !

अभिजित दीपके

नवी देहली – ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र द्यावे, या मागणीसाठी गेले ३६ दिवस आंदोलन करणार्‍या कॉकरोच जनता पक्षाने (‘सीजेपी’ने) प्रधान यांच्या त्यागपत्रानंतर आनंद साजरा केला. जंतरमंतर येथे आंदोलन करणार्‍यासमोर बोलतांना सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी ‘ते (सरकार) म्हणायचे, ‘या सरकारमध्ये त्यागपत्रे दिली जात नाहीत’; पण झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए’, असे विधान केले.

आमच्या आणखी २ मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन चालूच रहाणार ! – दीपके

अभिजित दीपके पुढे म्हणाले की, मंत्र्यांनी त्यागपत्र दिले आहे; पण आमच्या अजून २ मागण्या आहेत. आम्ही जंतरमंतरवरून असे जाणार नाही. एकदा कॉकरोच आत शिरले की, ते बाहेर येत नाही. आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची हानीभरपाई मिळाली पाहिजे. पोलीस अधिकार्‍यांवर खटला चालवला पाहिजे. देहली पोलिसांच्या अधिकार्‍यांनी हे लक्षात ठेवावे की, ते ‘कॉकरोच’शी वैर घेत आहेत. आम्ही एका मंत्र्याला त्यागपत्र देण्यास भाग पाडले आहे, तर तुम्ही कोण आहात ? (कॉकरोच्या डोक्यात गेलेली हवा ! जनता याकडे पहात आहे ! – संपादक) विद्यार्थ्यांवरील खटले मागे घेतले पाहिजेत. भाऊ, ही लोकशाही आहे. महिनाभर लोक मला विचारत होते, ‘तुम्ही काय करत आहात? अजून किती काळ इथे बसून रहाणार? ते त्यागपत्र देणार नाहीत. हे एक मनमानी सरकार आहे.’ पण आम्ही ते करून दाखवले.

आमच्या मागण्या मान्य झाल्या, तर आम्ही घरी जाऊ ! – आशुतोष रांका

आशुतोष रांका

कॉकरोच जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका म्हणाले की, तुम्ही (सरकारने) आमच्या ३ मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यास आम्ही घरी जाऊ.

हा लोकशाहीचा विजय ! – सोनम वांगचुक

सोनम वांगचुक

सोनम वांगचुक म्हणाले की, रस्त्यांवरून उदयास आलेली प्रत्यक्ष लोकशाही, हा शांतता, संयम आणि चिकाटी यांचा विजय आहे. सीजेपी आणि देशाच्या युवा पिढीचे अभिनंदन, आणि भीती अन् धाक-धमकी यांवर मात करून देशाच्या कानाकोपर्‍यातून आवाज उठवणार्‍या सर्व नागरिकांचे आभार.

(म्हणे) ‘आता प्रत्येक सरकारला जनतेचे ऐकावेच लागेल !’ – प्रियांका वाड्रा

प्रियांका वाड्रा

काँग्रेसच्या नेत्या प्रियांका वाड्रा म्हणाल्या की, आजपासून या देशातील प्रत्येक शासकाला हे लक्षात राहील की, त्याने जनतेचे ऐकलेच पाहिजे. (काँग्रेसने तिच्या सत्ताकाळात किती वेळा जनतेचे ऐकले ?, हे प्रियांका वाड्रा यांनी सांगितले पाहिजे ! देशात आणीबाणी लागू करून जनतेला वेठीस धरणार्‍या काँग्रेसने अशा प्रकारची विधाने न केलेलीच बरी ! – संपादक) देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. हा त्यांचा विजय आहे. आज रा.स्व. संघाने भारताची संपूर्ण शिक्षणव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे.

२९ वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधान यांनीही प्रश्नपत्रिका फुटीवरून केले होते आंदोलन !

धर्मेंद्र प्रधान यांचे माजी सहकारी प्रशांत राऊत यांनी सांगितले की, वर्ष १९९७ मध्ये जेव्हा ओडिशामध्ये प्रश्नपत्रिका फुटीची बातमी आली, तेव्हा प्रधान यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्यात अनुमाने १ सहस्र ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. धर्मेंद्र प्रधान यांना बेदम मारहाण झाली. त्यांना अनेक जखमा झाल्या, तसेच त्यांचा अस्थिभंगही झाला होता.