सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk

उपोषण सोडण्यामागे ‘तडजोड’ केल्याच्या आरोपावर सोनम वांगचुक यांचे प्रत्युत्तर

सोनम वांगचुक

नवी देहली – माझे उपोषण प्रामाणिक होते, हे सिद्ध करण्याचे किंवा चारित्र्य प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता आहे का ? उपोषण सोडल्यापासून अनेक लोक मला विचारत आहेत की, मी कुणाच्या प्रभावामुळे असे केले ? केंद्रीय मंत्र्यांकडूनच उपोषण का सोडले ? यामागे कोणती ‘तडजोड’ झाली ? २६ दिवस उपोषण केल्यानंतरही या प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागतात. मला जर सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर मला २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती. याआधीही अनेकांनी तडजोडी केल्या आहेत; पण त्यांनी अशाप्रकारे उपोषण केले आहे का ?, अशा शब्दांत ‘नीट’ प्रश्‍नपत्रिका फुटीच्या प्रकरणात उपोषण करणारे सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर त्यांच्यावर होणार्‍या टीकेवर अप्रसन्नता व्यक्त केली.

धर्मेंद्र प्रधान यांना त्यागपत्र द्यावे लागणारच आहे !

वांगचुक यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून म्हटले की, धर्मेंद्र प्रधान यांना त्यागपत्र आज ना उद्या द्यावे लागणारच आहे. केंद्राने त्यागपत्र घेतले नाही, तर सरकारचीच अपकीर्ती होत रहाणार आहे. त्यामुळे मी या मागणीवर ठाम राहिलो नाही. माझ्या दृष्टीने जंतरमंतरवर आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्त्वाची आहे.