मुंबापुरीत सहस्रोंच्या समष्टी संकल्पाने राष्ट्ररक्षणार्थ प्राप्त झाले आध्यात्मिक बळ !

वेदपरंपरेचे चिरकालीन आणि शाश्वत स्वरूप दर्शवणारे अन् देवता, निसर्ग आणि समाज यांना जोडणारे यज्ञ ! हे केवळ कर्मकांड नव्हे, तर प्राचीन भारतीय विज्ञानाधारित आध्यात्मिक स्तरावरील सनातन परंपरेची ही दैवी देणगी आहे !

प्राचीन काळात ऋषिमुनी आणि राजे यांनी अनेक यज्ञ केल्याच्या नोंदी धर्मग्रंथांत मिळतात. आजही कलियुगात यज्ञपरंपरा अबाधित ठेवणारे विद्वान पंडित या भारतभूवर आहेत, हे आपले अहोभाग्यच आहे !

यज्ञस्थळी पुष्पांनी सिद्ध केलेल्या देवीची वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती

सनातन संस्थेच्या वतीने तपोभूमी भारताला संरक्षककवच लाभावे आणि भारताची सर्वांगीण अभिवृद्धी व्हावी, या व्यापक उद्देशाने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेने १७ मे, म्हणजेच अधिक ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा या दिवशी श्री राजमातंगी महायज्ञाची प्रभादेवी, मुंबई येथे सांगता झाली !

श्री राजमातंगी महायज्ञ सुफळ संपूर्ण !

कमळावर आरूढ असलेल्या श्री राजमातंगी देवीचे प्रचलित चित्र

इरोड, तमिळनाडू येथील शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती आणि यज्ञाचे मुख्य आचार्य श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य अन् त्यांचे सहकारी असे पुरोहित, तसेच यज्ञाचे मुख्य यजमान म्हणून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु नीलेश सिंगबाळ, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ हे उच्च कोटीचे संत असा दैवदुर्लभ योग मुंबापुरीत जुळून आला अन् श्री राजमातंगी महायज्ञ यथासांग पार पडला !

८ सहस्रांहून अधिक प्रत्यक्ष आणि ४० देशांतील ५८ सहस्रांहून अधिक ऑनलाईन जोडलेल्या भाविकांनी या यज्ञाचा लाभ घेतला.

यज्ञात आहुती देतांना मुख्य आचार्य श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य, मागे बसलेले डावीकडून शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती, शिवश्री एस्. राजकुमार शिवम् आणि शिवश्री जी. कार्तिकेय शिवम्

महायज्ञाच्या माध्यमातून रामराज्याचा संकल्प !

आदर्श राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेला गती येण्यासाठी आध्यात्मिक ऊर्जाच आवश्यक असते. या यज्ञामुळे भारतभूभोवती संरक्षककवच निर्माण झाले. आज राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्न होत असतांना श्री राजमातंगी महायज्ञाच्या माध्यमातून झालेल्या समष्टी महासंकल्पाने आपत्काळात राष्ट्राचे संरक्षण आणि पर्यायाने पुढील काळातील समृद्धी यांसाठी आध्यात्मिक बळही मिळाले ! सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांच्या राष्ट्र आणि धर्म कार्याचा आरंभ २५ वर्षांपूर्वी ज्या मुंबापुरीतून केला, त्याच नगरीतून एकप्रकारे भावी रामराज्याच्या संकल्पाचा श्रीगणेशा या महायज्ञाच्या संकल्पातून झाला !