Shankhnad Mahotsav Delhi : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे समारोपीय सत्र – सनातन राष्ट्र संकल्पसभा

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव देहली २०२५

‘सनातन राष्ट्र संकल्प संतसभा’ समारोपीय सत्र

डावीकडून सद्गुरु नीलेश सिंगबाळ, श्री. उदय माहुरकर, प.पू. युधिष्ठिरलालजी महाराज, केंद्रीय राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक, पू. पवन सिन्हा गुरुजी, स्वामी विज्ञानानंद, श्री. रमेश शिंदे, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

सनातन राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात योगदान द्या ! – प.पू. युधिष्ठिरलाल महाराज, पीठाधीश्वर, शदाणी दरबार, छत्तीसगड

भारत मंडपम्, देहली : सनातन संस्था हिंदूंना सर्वांगीण धर्मशिक्षण देऊन करत असलेले धर्मजागृती आणि संस्कृतीसंवर्धनाचे कार्य अद्वितीय आहे. सनातन संस्थेच्या कार्यामुळे राष्ट्र बलशाली होईल. आज सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी उपस्थित प्रत्येकाने येथून पुढे आपापल्या क्षेत्रात सनातन राष्ट्राच्या स्थापनेचे कार्य करण्याचा सुसंकल्प केला पाहिजे !

प.पू. युधिष्ठिरलाल महाराज यांचा सन्मान करतांना सद्गुरु नीलेश सिंगबाळ (डावीकडील)

त्यासाठी आवश्यक ते संघटन करणे, कृतीशील होणे, हीच खरी या महोत्सवाची फलनिष्पत्ती असेल, असे आवाहन छत्तीसगड येथील ‘शदाणी दरबारा’चे नववे पीठाधीश्वर प.पू. युधिष्ठिरलाल महाराज यांनी केले. ते महोत्सवाच्या समारोपाच्या वेळी झालेल्या ‘सनातन राष्ट्र संकल्प संतसभे’त बोलत होते. या वेळी त्यांनी ‘विस्थापित हिंदूंच्या पुनर्वसना’साठी शासनाने अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहनही केले.

चारित्र्यवान लोकच युद्ध जिंकू शकतात ! – पू. पवन सिन्हा गुरुजी, संस्थापक, पावन चिंतनधारा आश्रम

पू. पवन सिन्हा गुरुजी

भारत मंडपम्, देहली : चारित्र्यवान लोकच धर्मयुद्ध करू शकतात. ज्यांच्याकडे चारित्र्य नाही, ते युद्ध जिंकू शकत नाहीत. भारताकडे चरित्र्य असल्यामुळे पाकिस्तानच्या विरोधातील अनेक लहान-मोठ्या युद्धांत भारताला यश मिळाले. चारित्र्य निर्माण करणे सोपे नाही आणि चारित्र्याचा शिक्षणाशी काहीही संबंध नाही. अनेक उच्च विद्याविभूषित लोक भ्रष्टाचारी आहेत. सध्याचे शिक्षण युवकांमध्ये चारित्र्य निर्माण करू शकत नाही. शिक्षकांना त्यासाठी वेळच नाही. देशात अनेक विद्यालये आहेत, तरीही युवकांमधील चारित्र्य संकुचित होत आहे. चारित्र्य निर्माण होण्यासाठी समाज आणि राष्ट्र यांविषयी प्रेम असणे आवश्यक आहे. त्यासाठी मुलांना चांगले शिक्षण देण्यासह त्यांच्यासमोर चांगले आदर्शही ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्यात जागृती करावी लागेल, असे मार्गदर्शन ‘पावन चिंतनधारा आश्रमा’चे संस्थापक पू. पवन सिन्हा गुरुजी यांनी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त केले.

‘सनातन राष्ट्र आणि युवकांची जागृती’या विषयावर बोलतांना ते म्हणाले,

‘‘आपल्या देशात महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांच्यासारखे अनेक चारित्र्यवान महापुरुष होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज तलवार चालवण्यात निपुण होते; म्हणून नाही, तर ते चारित्र्यवान होते; म्हणून जग त्यांना मानते. लोक त्यांचा आदर्श घेतात, त्यांचा आदर करतात, त्यांना छत्रपती म्हणतात आणि त्यांचा जयघोष करतात. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील नायक नाही, तर राष्ट्रपुरुषांचा आदर्श तरुण पिढीसमोर ठेवणे आवश्यक आहे.’’

हिंदूंनी गमावलेले भूप्रदेश परत जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! – स्वामी विज्ञानानंदजी, सह महामंत्री, विश्व हिंदु परिषद

स्वामी विज्ञानानंदजी

भारत मंडपम्, देहली : जे राष्ट्र हिंदु जीवनपद्धत स्वीकारील, ते हिंदु राष्ट्र बनेल. स्वातंत्र्यपूर्व भारत समृद्ध होता. सूर्याच्या उदयापासून ते अस्तापर्यंतचा सर्व भूप्रदेश हिंदूंच्या अधिपत्याखाली होता. गतकाळात हा सर्व प्रदेश आपण गमावला आहे. आज हिंदूंची केवळ भारतातीलच काही राज्यांमध्ये सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी केवळ दांडिया, होळी किंवा दिवाळी यांसारख्या सणांमध्ये रमून न जाता उर्वरित प्रदेश जिंकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यामुळे आपला देश केवळ हिंदु राष्ट्रच नाही, तर ‘रिपब्लिक हिंदु राष्ट्र’ बनेल, असे प्रतिपादन विश्व हिंदु परिषदेचे सह महामंत्री स्वामी विज्ञानानंदजी यांनी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त संबोधित करतांना केले.

‘हिंदूंचे सांस्कृतिक घोषणापत्र’ या विषयावर बोलतांना स्वामीजी म्हणाले, ‘‘हिंदू अत्यंत सहिष्णु बनले आहेत. ‘शत्रू शरणागत भावाने आला, तरी त्याच्यावर कधीही दया दाखवू नये’, असे शास्त्र सांगते. जसा शत्रू असेल, तसेच त्याच्याशी वागले पाहिजे, तरच आपला समाज आणि राष्ट्र यांचे रक्षण होईल अन् हाच धर्म आहे. त्यामुळे राष्ट्राचे रक्षण होण्यासाठी आधी शत्रूबोध होणे आवश्यक आहे. तरुणांना शौर्य आणि साहस निर्माण करणारे शिक्षण मिळाले पहिजे. आपण विविध भाषा बोलत असलो किंवा विविध ग्रंथ वाचत असलो, तरी संघटित रहाणे, हाच हिंदु राष्ट्राचा खरा सिद्धांत आहे.’’

आगामी आपत्काळात रक्षण होण्यासाठी भगवंताचे भक्त बना ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक,  हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

भारत मंडपम्, देहली : जेव्हा पृथ्वीवर अधर्म माजतो, तेव्हा शांती निर्माण होण्यासाठी युद्ध करावेच लागते. त्यालाच ‘आपत्काळ’ म्हणतात. तो सांगून येत नाही, तर ठरलेल्या कालचक्रानुसार येतो. मागील २-३ वर्षांपासून संपूर्ण विश्वात युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक राष्ट्रे युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. तिसरे युद्ध कधी चालू होईल, हे सांगता येत नाही. माजी सैन्यप्रमुख विपीन रावत यांनी म्हटल्याप्रमाणे या काळात भारताला युद्धाच्या वेळी केवळ सीमांवर नाही, तर अडीच स्तरावर (चीन, पाकिस्तान आणि अंतर्गत शत्रू) लढाई करावी लागणार आहे. सध्या भारतविरोधी शक्ती विविध माध्यमांतून देशात अशांती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध संत, द्रष्टे आणि सप्तर्षि यांनी केलेली भविष्यवाणी सत्य होतांना दिसत आहे. त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपत्काळात युद्ध, पूर, भूकंप, रोगराई इत्यादींचा घोर आपत्काळ येईल आणि त्यात प्रचंड मनुष्यहानी होईल. असे असले, तरी ‘नमे भक्त: प्रण्यशति ।’, म्हणजे ‘माझ्या भक्ताचा नाश होणार नाही’, असे भगवंताचे वचन आहे. त्यामुळे आपत्काळापासून रक्षण होण्यासाठी विविध सुरक्षात्मक उपायांसह आध्यात्मिक साधना करून त्याचे भक्त बनणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘भावी आपत्काळ आणि सुरक्षात्मक उपाय’ या विषयावर बोलतांना केले.

हिंदूंनी आपला खरा शत्रू ओळखून शिवछत्रपतींच्या शौर्यपूर्ण मार्गाने कार्यरत व्हावे ! – उदय माहुरकर, संस्थापक, सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या समारोप सत्रात सनातन संस्थेवर स्तुतीसुमनांचा वर्षाव !

भारत मंडपम्, देहली (वार्ता.) : हिंदूंनी आपल्या खर्‍या शत्रूला ओळखले पाहिजे. त्यासाठी काही कृती कराव्यात आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातील घटनांतून बोध घेऊन त्यांनी अंगीकारलेल्या शौर्ययुक्त मार्गाने कार्य करायला हवे, असे मार्गदर्शन ‘सेव्ह कल्चर सेव्ह भारत फाऊंडेशन’चे संस्थापक अन् माजी सूचना आयुक्त श्री. उदय माहुरकर यांनी केले. ते ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या ‘सनातन राष्ट्र संकल्प संतसभे’त ‘चक्रवर्ती सम्राट छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर बोलत होते. या समारोपाच्या सत्रामध्ये उपस्थित अनेक संत, तसेच श्री. माहुरकर यांनी सनातन संस्थेच्या कार्याचा गौरवाने उल्लेख केला.

श्री. माहुरकर पुढे म्हणाले की,

छत्रपती शिवाजी महाराजांनी ५ वेळा औरंगजेबाला क्षमापत्रे पाठवली. ५ वेळा संधी केली; मात्र त्यातील ३ संधींच्या अटी त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाच्या आड येताच महाराजांनी त्यांचा भंग केला. अफझलखानाच्या नियोजनबद्ध वधामुळे शिवछत्रपतींचा दबदबा संपूर्ण भारतात झाला. सुरतेची लूट केल्यानंतर शिवछत्रपतींनी सिंधुदुर्ग आणि रायगड आदी गड बांधून राष्ट्रहित साधले. औरंगजेबाच्या बंदीवासात असतांनाही महाराजांनी तेथील राजपुतांना आपलेसे करून घेतले होते. शिवछत्रपतींच्या याच यशस्वी राजनीतीचा उपयोग झाल्यास सनातन राष्ट्राची स्थापना दूर नाही.

सनातन संस्था ही भारतातील एकमेव सात्त्विक संस्था !

श्री. उदय माहुरकर म्हणाले,

‘‘सनातन संस्था ही खर्‍या अर्थाने भारतातील क्रमांक एकमेव सात्त्विक संस्था आहे. सनातन संस्थेने देहलीत येऊन ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करणे, ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना आहे !’’

श्री. माहुरकर यांनी मांडलेली अन्य महत्त्वाची सूत्रे –

१. भारतीय स्वातंत्र्याच्या वेळी बॅरिस्टर जिना यांनी वेगळा पाकिस्तान मागितला; मात्र त्यांनी ‘भारतातील मुसलमानांना कशी वागणूक मिळावी’, यासाठी दिलेला दुसरा पर्यायही गांधी आणि नेहरू यांनी स्वीकारला. त्यामुळे पंथावर आधारित स्वतंत्र देश देऊनही दुसरा पर्याय स्वीकारल्याने भारत हिंदु राष्ट्र होऊ शकले नाही, ही हिंदूंची शुद्ध फसवणूक होती.

२. या देशात गांधींच्या विचारांविषयी व्यापक चर्चा झाली पाहिजे. गांधींची ‘संपूर्ण अहिंसा’ आणि ‘हिंदूंचा बळी देऊन हिंदू-मुस्लिम ऐक्य’ हे विचार राष्ट्रघातकी होते.

३. हिंदूंनी भावनाशील हिंदुत्वासह किंबहुना त्याहून अधिक महत्त्व कृतीशील हिंदुत्वाला दिले पाहिजे !

४. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यासारखे राष्ट्ररक्षणार्थ कणखर निर्णय घेणारे नेतृत्व लाभणे, हे आपले भाग्यच !

क्षणचित्रे

१. या सत्रात संतगण आणि मान्यवर यांच्या हस्ते श्री. मदन गुप्ता यांच्या ‘अपूर्व भारतम्’ या कन्नड भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. यात प्राचीन वैज्ञानिक भारत कसा होता, याविषयीचे विवेचन आहे.

२. विश्व हिंदु परिषदेचे सह-महामंत्री पू. विज्ञानानंद महाराज यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा प्रारंभ स्वतः शंखनाद करून केला.

३. महोत्सवाची सांगता संपूर्ण ‘वन्दे मातरम् ।’ने झाली.