सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्‍यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !

सासवड-जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघात

सांगली – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या वेळी सासवड-जेजुरी मार्गावरील जेजुरी-बेलसर परिसरात झालेल्या दुर्दैवी अपघातात सांगली जिल्ह्यातील ३ महिला वारकर्‍यांचा मृत्यू झाला, तर काही वारकरी घायाळ झाले. या घटनेविषयी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या घटनेनंतर अपघातातील मृतांना ५ लाख रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे. घायाळांच्या उपचाराचा व्यय शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हा स्तरावरील प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करून; राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

या घटनेत सांगली जिल्ह्यातील राजश्री शंकर भोसले (वय ६२ वर्षे), माधवी राजाराम सरवडे (वय ५५ वर्षे), नंदा बाबुराव पवार (वय ५२ वर्षे) या महिला वारकर्‍यांचा मत्यू झाला. या संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, वारकर्‍यांची सुरक्षितता ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संपूर्ण वारी मार्गावर आवश्यक त्या सर्व सुरक्षा उपाययोजना अधिक प्रभावीपणे करण्यात येतील.