श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !

प्रांत प्रचारकांच्या राष्ट्रीय बैठकीचा समारोप

उपस्थितांना मार्गदर्शन करतांना प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

बेळगाव – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारकांच्या बैठकीचा कर्नाटकातील बेळगाव येथे समारोप झाला. श्रीराम जन्मभूमी मंदिरातील दानपेटीतील देणग्यांच्या मोजणीतील अनियमिततेच्या घटनेविषयी सर्व उपस्थितांनी दुःख व्यक्त केले आणि तीर्थक्षेत्र न्यासाच्या विनंतीनुसार चालू असलेले विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त करण्यात आला. भविष्यात अशी कोणतीही घटना घडू नये, ज्यामुळे सर्व श्रीरामभक्तांच्या श्रीराममंदिराप्रती असलेल्या गाढ श्रद्धेला आणि भक्तीला धक्का बसेल, अशी तीर्थक्षेत्र न्यासाची अपेक्षा आहे.

या बैठकीत मार्च २०२६ नंतर संघाच्या विविध स्तरांवर आयोजित केलेल्या प्रशिक्षण शिबिरांचा आढावा घेण्यात आला. या वर्षी देशभरात एकूण ८३ ‘संघ शिक्षा वर्ग’ आणि १२ ‘कार्यकर्ता विकास वर्ग’ आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये एकूण १८ सहस्र ८४२ स्वयंसेवकांना शाखा व्यवस्थापन, संघ कार्यपद्धती, ग्रामीण विकास, कुटुंब जागृती, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण आणि इतर अनेक विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले.

या बैठकीला प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत,  सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह २२६ पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत शाखा स्तरावरील कृती योजनांच्या कार्यवाहीवर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि सप्टेंबर महिन्यात शाखांचा अधिकाधिक विस्तार करण्याच्या योजनेवरही विचारविनिमय करण्यात आला. याव्यतिरिक्त शताब्दी वर्षात पूर्ण झालेल्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला. त्याचसमवेत उर्वरित नियोजित कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. शताब्दी वर्षाच्या विविध कार्यक्रमांमधून संपर्कात आलेल्या लोकांना समाजकार्यात आणि पंचविध परिवर्तनात सक्रीयपणे सहभागी करून घेण्याच्या धोरणांवर चर्चा झाली. या बैठकीत प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या २०२६-२७ या वर्षाच्या दौर्‍यावर चर्चा झाली.

अमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांविषयी चिंता ! 

या बैठकीत सद्यस्थितीशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली, ज्यात प्रामुख्याने जनगणनेच्या संदर्भातील माहिती आणि लोकसंख्याशास्त्रीय असंतुलनामुळे निर्माण होणार्‍या आव्हानांचा समावेश होता. अमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांविषयी चिंता व्यक्त करण्यात आली, तसेच व्यसनमुक्तीसाठी प्राधान्यक्रमाने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करण्यात आले. ‘संत शिरोमणी रविदास महाराजजींच्या ६५० व्या जयंती वर्षासाठी कार्यक्रमांचे नियोजन करण्यावर चर्चा झाली.