SANATAN PRABHAT EXCLUSIVE : देशातील सरकारांनी ‘हिस स्टोरी ऑफ इतिहास’ चित्रपटाच्या प्रसारणासाठी साहाय्य करावे !

  • ‘सनातन प्रभात’चा चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक मनप्रीत सिंह धामी यांच्याशी थेट संवाद !

  • राजकीय आणि आर्थिक समर्थन नसल्याने जनतेच्या समर्थनाचीही व्यक्त केली अपेक्षा !

  • चित्रपटाला करमुक्त करण्याचीही केली मागणी !

एक षड्यंत्र ! ‘चित्रपट प्रदर्शित होऊन ३ आठवडे झाले, तरीही त्याला चित्रपटगृहे मिळू दिली जात नाहीत !

नवी देहली : ‘हिस स्टोरी ऑफ इतिहास’ या चित्रपटाची निर्मिती करणे मी माझे कर्तव्य समजतो. कोणत्याही चित्रपटाला एकतर राजकीय समर्थन लागते अथवा आर्थिक साहाय्य लागते. माझ्याकडे यांपैकी काहीही नाही. असे असले, तरी जनतेच्या समर्थनाने ‘हिस स्टोरी ऑफ इतिहास’ चित्रपट अधिकाधिक समाजापर्यंत पोचू शकतो. जनतेचे अशा प्रकारे साहाय्य मिळणे आजपर्यंत कोणत्याही चित्रपटासंदर्भात झालेले नाही; परंतु या चित्रपटाच्या निमित्ताने जनतेने आपल्या शहरात अथवा गावात तो दाखवण्याची संघटितपणे मागणी केली, तर काहीही होऊ शकते, अशी आशा चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक मनप्रीत सिंह धामी यांनी ‘सनातन प्रभात’कडे व्यक्त केली. चित्रपट प्रदर्शित होऊन ३ आठवडे झाले. त्या निमित्ताने ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने त्यांच्याशी दूरभाषवरून संवाद साधला. धामी यांनी देशातील सरकारांनी आम्हाला चित्रपटाच्या प्रसारणासाठी साहाय्य करावे, तसेच चित्रपटाला करमुक्त करावे, अशी विनंतीही केली.

दिवाळे निघण्याची स्थिती !

‘चित्रपट प्रदर्शित होऊन ३ आठवडे झाले, तरीही त्याला चित्रपटगृहे मिळू दिली जात नाहीत. आमचे दिवाळे निघण्याच्या स्थितीला आम्ही पोचलो आहोत, तरी आम्ही चित्रपटाच्या प्रसारणासाठी प्रयत्न करतच राहू’, अशी खंतही धामी यांनी व्यक्त केली.

धामी यांनी उपस्थित केलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !

१. चित्रपटातून आम्ही कोणत्याही सरकारची अथवा राजकीय पक्षाची स्तुती केलेली नाही.  जे सत्य आहे, तेच दाखवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे.

२. ‘चित्रपटाला ‘ओटीटी’वर प्रदर्शित करणार का ?’, या प्रश्‍नावर ते म्हणाले की, ओटीटीवर प्रसारित करण्यासाठी एकतर चित्रपटाला अधिकाधिक पाहिले गेले पाहिजे अथवा चित्रपटात कुणी मोठे कलाकार अथवा त्यांची मुले (स्टार्स ऑर स्टार किड्स) असली पाहिजेत. हे दोन्हीही आमच्या चित्रपटात नाही.

शाळा-महाविद्यालयांतून चित्रपट दाखवण्याचे स्वयंसेवी संघटनांना आवाहन !

शाळा-महाविद्यालयांतून हा चित्रपट दाखवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी अधिकाधिक स्वयंसेवी संस्था, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि आध्यात्मिक संस्था यांनी पुढे यावे आणि चित्रपटाला प्रायोजक मिळवून देऊन तो अधिकाधिक मुलांना दाखवावा, असे मी आवाहन करतो, असे धामी यांनी दूरभाषवरील मुलाखतीतून ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला सांगितले.

३. ५० लाखांहून अधिक लोकांनी चित्रपटाचे ‘ट्रेलर’ (छोटे विज्ञापन) पाहिले आहे. तरी ज्यांना ते आवडले, त्यांनी चित्रपट पहावयास मिळावा, अशी मागणी लावून धरली पाहिजे.

४. चित्रपट करण्याची प्रेरणा कुठून मिळाली, यावर बोलतांना धामी म्हणाले की, जेव्हा मला नीरज अत्री यांचे कार्य समजले, तेव्हा ‘आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला गेला’, हे लक्षात येऊन मी संतापलो. मी शीख असल्याने मोगलांचा इतिहास मला ज्ञात होताच; परंतु इतिहासाचे पुस्तकांतून अशा प्रकारे विकृतीकरण करण्यात आले आहे, हे अत्री यांचे पुस्तक वाचूनच मला समजले. चित्रपटासाठी कथा लिहिणे आणि तिचे दिग्दर्शन करणे, हे मी माझे कर्तव्य समजतो.

हे ही वाचा →

His Story of Itihaas : इतिहासाच्या विकृतीकरणावर आधारित ‘हिस स्टोरी ऑफ इतिहास’ चित्रपट प्रदर्शित ! 

‘His Story Of Itihaas’ Movie : कोणत्याही अधिकृत बंदीखेरीज ‘हिस स्टोरी ऑफ इतिहास’सारख्या चित्रपटांचे प्रसारण रोखले जाते !

लेखक-दिग्दर्शक मनप्रीत सिंह धामी

संपादकीय भूमिका

अशा चित्रपटांच्या अधिकाधिक प्रसारणासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे, हे त्यांचे धर्मकर्तव्य आहे. हे लक्षात घेऊन जनतेने स्थानिक ठिकाणच्या चित्रपटगृहांमध्ये तो लावण्यासाठीची मागणी लावून धरणे अत्यावश्यक !