बंगालमधील योद्धेसंन्यासी पद्मश्री स्वामी प्रदिप्तानंद महाराज !

भारत सेवाश्रम संघाचे स्वामी प्रदिप्तानंद महाराज उपाख्य कार्तिक महाराज किशोरावस्थेत असतांना भारत सेवाश्रम संघाकडे आकर्षित झाले. औरंगाबाद (जिल्हा मुर्शिदाबाद, बंगाल) येथील स्वामी प्रज्ञानंद महाराजांकडून दीक्षा घेऊन ते ब्रह्मचारी बनले. ते स्वामी हिरण्मयानंदजी महाराजांच्या सान्निध्यात वाढले. वयाच्या २० व्या वर्षी त्यांना मुर्शिदाबादमधील बेलडांगा येथे नियुक्त करून त्यांना आश्रम बांधण्याचे दायित्व देण्यात आले.

स्वामी प्रदिप्तानंद महाराज उपाख्य कार्तिक महाराज

विशेष सदर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्‍या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक

१. स्वामी प्रदिप्तानंद महाराज यांचे कार्य

भारत सेवाश्रम संघाच्या एका कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘जेव्हा स्वामी भारत सेवाश्रमामध्ये आले, तेव्हा बेलडांगा भारत सेवाश्रम संघाकडे काहीही नव्हते. हळूहळू त्यांनी एक आश्रम आणि १२ शाळा बांधल्या. त्यात ३ सहस्रांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. स्वामीजींनी मुर्शिदाबादमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी प्रशंसनीय काम केले आहे. त्यांनी मुर्शिदाबाद जिल्ह्यात रुग्णालयेही बांधली आहेत. यासमवेतच त्यांनी बालविवाहाविरुद्ध चळवळ चालू केली. बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार करण्यात आले. याविरोधात स्वामी प्रदिप्तानंद महाराज यांनी आवाज उठवला. त्यांच्या अध्यक्षतेखाली कोलकाता येथे भारतातील पहिल्या ‘लक्ष कंठ गीतापाठ’ चे आयोजन करण्यात आले. त्यासाठी १ लाखाहून अधिक लोकांनी नोंदणी केली होती. अशाच प्रकारचे आयोजन त्यांनी बांगलादेश आणि उत्तर बंगाल येथेही केले. स्वामीजींनी नादिया जिल्ह्यात २ कुंभमेळे आयोजित केली आहेत. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी हिंदु देवतांचा अपमान केला होता. त्याविरोधात स्वामीजींनी निदर्शने केली, तसेच दुर्गादेवीच्या मूर्तीच्या हातात तृणमूलचा झेंडा देण्यात आला होता. त्या विरोधातही स्वामीजींनी निदर्शने केली.

‘पद्म’ पुरस्कार २०२५

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून ‘पद्मश्री’ पुरस्कार स्वीकारतांना स्वामी प्रदिप्तानंद महाराज

स्वामीजींच्या प्रवचनांनी बंगालमध्ये नवी क्रांती आणली आहे. हिंदु जागृतीसाठी सतत प्रयत्नशील असलेले स्वामीजी ‘सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे संतु निरामया:’च्या सनातन परंपरेच्या मार्गावर निरंतर अग्रेसर आहेत. ते बंगालमध्ये आक्रमक हिंदुत्वाचे ध्वजवाहक राहिले आहेत. ते वर्ष २०१४ मध्ये गोवा येथे झालेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनामध्ये सहभागी झाले होते. त्यांचे शैक्षणिक आणि वैद्यकीय कार्य पाहून नुकताच केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे.

‘भारत सेवाश्रम संघा’चे कार्य

आचार्य प्रणवानंद महाराज

आचार्य प्रणवानंद महाराज यांनी सामाजिक कार्य करणे आणि हिंदु धर्माचा प्रसार करणे, यांसाठी वर्ष १९१७ मध्ये भारत सेवाश्रम संघाची स्थापना केली. ही संघटना गेली १०७ वर्षे लोकसेवेत कार्यरत आहे. आचार्य प्रणवानंद महाराज हे स्वातंत्र्य चळवळीतही सक्रीय होते. ‘भारत सेवाश्रम संघा’चे मुख्यालय कोलकाता येथे असून जगभरात त्यांची ४६ केंद्रे आहेत. त्यांनी संपूर्ण भारतातील हिंदु यात्रेकरूंसाठी विशेषतः केदारनाथ, बद्रीनाथ, हरिद्वार आणि गया सांरख्या ठिकाणी अतिथीगृहे बांधली आहेत.

भारत सेवाश्रम संघाचे वाराणसी येथील केंद्र

भारत सेवाश्रम संघाच्या वतीने रुग्णालये आणि शाळा चालवल्या जातात. सुशिक्षित हिंदूंमध्ये स्वसंरक्षणाची भावना निर्माण करण्यासाठी भारत सेवाश्रम संघ हिंदु मिलन मंदिरांसह हिंदु रक्षा दलांचे आयोजन करते. पूर, चक्रीवादळ आणि महामारी अशा आपत्तीच्या वेळीही त्यांचा साहाय्य आणि पुनर्वसनाच्या कार्यात विशेष सहभाग असतो.

भारत सेवाश्रम संघाबद्दल अधिक माहिती आपण  https://www.bharatsevashramsangha.org/ या संकेतस्थळावर पाहू शकता.

२. स्वामी विवेकानंद सेवा सन्मान

कोलकाता येथील सुप्रसिद्ध श्री बडाबाजार कुमारसभा पुस्तकालयाच्या वतीने  २ मार्च २०२५ यादिवशी प्रदिप्तानंदजी महाराज यांना ‘३९ वा स्वामी विवेकानंद सेवा सन्मान’ पुरस्कार देण्यात आला.

वर्ष २०१४ मध्ये संपन्न झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात स्वामी प्रदिप्तानंद महाराज यांना सन्मानित करतांनाचा क्षण !

३. ‘पश्चिम बंगाल परिषद’मध्ये सहभाग

ऑगस्ट २०१२ मध्ये हावडा जिल्ह्यातील आर्य समाज मंदिर येथे ‘पश्चिम बंगाल परिषद’ आयोजित करण्यात आली होती. त्यात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु चारुदत्त पिंगळे आणि आर्य समाजाचे स्वामी महेश योगी यांच्यासह स्वामी प्रदीप्तानंद सहभागी झाले होते.

स्वामी प्रदिप्तानंद महाराज यांचे जाज्वल्य विचार

स्वामी प्रदिप्तानंद महाराज

१. मोहनदास गांधींना राष्ट्रपिता म्हणणे, हे भारताचे दुर्दैव आहे.

२. हिंदूंनी लीला करणार्‍या कृष्णाऐवजी योद्धारूप असलेल्या बासरीधारी कृष्णाची पूजा करण्यास प्रारंभ करावा.

३. जर कुणी आपल्या धर्माचा अपमान केला, तर आपण त्या व्यक्तीला धडा शिकवला पाहिजे, हीच धर्माची हाक आहे.

४. हिंदूंना त्यांच्यावरील आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी आणि सूड घेण्यासाठी सिद्ध रहावे लागेल. हिंदूंच्या सर्व देवतांकडे शस्त्रे आहेत. असुरांशी शस्त्रांनी लढावे लागेल. त्यामुळे आपल्या प्रत्येक घरात शस्त्रपूजन करणे आवश्यक आहे.

४. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी सरकारचा ‘भारत सेवाश्रम संघा’ला विरोध

मागील वर्षी ‘बंगाल सरकार ‘भारत सेवाश्रम संघा’चा आश्रम पाडणार आहे’, अशी भीती स्वामी प्रदिप्तानंद महाराज यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आश्रमाला संरक्षण मिळावे, अशी मागणी त्यांनी उच्च न्यायालयात केली होती.

हे वाचा → ममता बॅनर्जी सरकार ‘भारत सेवाश्रम संघा’चा आश्रम पाडणार असल्याने आश्रमाला संरक्षण द्यावे ! – महंतांची उच्च न्यायालयात मागणी

🪷हिंदुत्वाचे शिलेदार या सदरामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या मान्यवरांची माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा !🪷