|
नवी देहली : भारताने पाकमधील आतंकवादी तळांवर केलेल्या आक्रमणानंतर चवताळलेल्या पाकने सलग तिसर्या दिवशी भारतावर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांद्वारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. भारताने हेही ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांना हवेत उद्ध्वस्त केले. तसेच १० मेच्या सकाळी भारताने प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या वायूदलाचे ४ आणि सैन्यदलाचे ४ तळ यांना लक्ष्य करून तेथे आक्रमण केले.
यात त्यांची किती हानी झाली, हे समजू शकले नसले, तरी याचे व्हिडिओ पाकिस्तानातूनच सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले सैन्याकडून पाकव्याप्त काश्मीरमधील जिहादी आतंकवाद्यांचे लाँच पॅड (आतंकवाद्यांना भारतात कारवाया करण्यासाठी एकाच ठिकाणी एकत्र आणण्याचे ठिकाण) उद्ध्वस्त केले. यात किती आतंकवादी ठार झाले, हे समजू शकलेले नाही. पाकने जम्मू, काश्मीर येथील सीमेवर अनेक ठिकाणी गोळीबार केला, तसेच मोर्टारांचा मारा केला. यात ५ भारतियांचा मृत्यू झाला. यानंतर त्यालाही भारताकडून प्रत्युत्तर देण्यात आले. येथे भारतीय सैन्याने गोळीबार आणि तोफगोळे यांचा पाक सैन्यावर मारा करत त्यांच्या चौक्या उद्ध्वस्त केले. याचे व्हिडिओ भारतीय सैन्याकडून प्रसारित करण्यात आले.
🇮🇳💥🇮🇩 India strikes back HARD!
Destroyed 8 Pakistan Air Force & military bases in response to 26 attacks. – Colonel Sofiya Qureshi
"We've taken out military checkpoints & terrorist launch pads."
Enough is enough! Time for decisive action to dismantle terror infrastructure &… pic.twitter.com/gEzo83im5E
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 10, 2025
१. पाकिस्तानकडून ९ मेच्या रात्री ९ पासून १० मेच्या सकाळ पर्यंत भारताच्या जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या राज्यांच्या सीमेवरील सैन्यतळांवर, वायूदलाच्या तळांवर, तसेच नागरी वस्त्यांवर २६ ठिकाणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांद्वारे आक्रमण केले.
२. भारताने ही आक्रमणे एस्-४००, तसेच अन्य हवाई संरक्षण यंत्रणांद्वारे हवेतच उद्ध्वस्त केली. यात भारताने पाकची ‘फतेह-१’ नावाचे क्षेपणास्त्र उद्ध्वस्त केले.
३. पाकने राजौरी, पूंछ आणि जम्मू येथे गोळीबार केला. राजौरी येथे १० मेच्या सकाळी पाकने डागलेल्या तोफगोळ्याच्या स्फोटात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्त राज कुमार थापा हे सरकारी अधिकारी ठार झाले. तसेच या आक्रमणात अन्य ४ जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
४. भारताने १० मेच्या सकाळी पाकच्या नूर खान (रावळपिंडी), मुरीद (चकवाल, पंजाब), रफीकी (शोरकोट, पंजाब) आणि रहीमयार खान (पंजाब) या वायूदलांच्या ४ तळांना लक्ष्य केले. येथे ड्रोनद्वारे भारताने आक्रमण केले. यात या तळांची मोठी हानी झाली नसल्याचा दावा पाकच्या सैन्याने केला असला, तरी येथे आग लागून धूर येथे असल्याचे व्हिडिओ समाेर आले आहेत.
५. सुक्कुर, चुनया, पसरूर आणि सियालकोट येथील सैन्य तळांवर आक्रमण करण्यात आले. तसेच जकोकाबाद येथील वायूदलाच्या तळावरही आक्रमण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. येथील आक्रमणानंतर आग लागल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत.
६. भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाककडून विमान वाहतूक बंद करण्यात आली आहे. पाकमध्ये कोणतेही विमान उडणार नाही आणि अन्य देशांच्या विमानांना उडण्यास बंदी असणार आहे.
‘एस्-४००’ यंत्रणा नष्ट केल्याचा पाकचा पोकळ दावा
पाकिस्तानने भारताच्या आदमपूर, उधमपूर, पठाणकोट, सुरतगड आणि सिरसा येथील वायूदलाच्या तळांवर आक्रमण केले होते. ही आक्रमणे उद्ध्वस्त करण्यात आली. याच वेळी पाकने दावा केला की, त्याने उधमपूर येथे भारताच्या ‘एस्-४००’ हवाई संरक्षण यंत्रणेला नष्ट केला; मात्र भारतीय सैन्याने हा दावा फेटाळून लावला. तसेच पाकने राजौरी येथील सैनिकी प्रशिक्षण केंद्र आणि पंजाबमधील बियास येथील ब्रह्मोस साठवण सुविधा यांना उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. तोही भारताने फेटाळून लावला.
‘ऑपरेशन बुनयान-उल-मरसूस’ ! – पाकच्या कारवाईचे नाव
भारताने पाकमधील आतंकवाद्यांच्या विरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ चालू केले आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकने ‘ऑपरेशन बुनयान-उल-मरसूस’ अशी मोहीम चालू केली आहे. याचा अर्थ ‘रक्षण करणारी भक्कम भिंत’ असा होतो.
(म्हणे) ‘प्रत्युत्तर देण्याखेरीज पर्याय नव्हता !’ – पाकचे उपपंतप्रधान इशाक डार

पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार म्हणाले की, नूर खान वायूदलाच्या तळावर भारताने केलेल्या आक्रमणानंतर पाकिस्तानी सैन्याच्या नेतृत्वाने हा निर्णय घेतला. आता आणखी संयम नाही. आम्ही केवळ त्यांना प्रत्युत्तर देत आहोत. गेल्या ३ दिवसांत भारताने कितीही नाटक रचले असले, तरी आम्ही त्यांना या प्रदेशात त्याचे वर्चस्व प्रस्थापित करू देणार नाही. आज आपण चालू केलेले ऑपरेशन एका ना एका मार्गाने संपेल; पण हे सर्व भारताला काय हवे आहे यावर अवलंबून आहे.
संपादकीय भूमिका : याला म्हणतात, चाेराच्या उलट्या बोंबा ! |
(म्हणे) ‘आम्ही भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांद्वारे आक्रमण केल्याचे आरोप चुकीचा !’ – पाकचे सैन्य
पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांद्वारे आक्रमण केल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, भारताच्या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नाही. तो सतत खोटे बोलतो. त्याचा आरोप खोटा आहे. जर हे खरे असेल, तर पुरावा कुठे आहे ? उलट गेल्या २ दिवसांत पाकिस्तानने भारतातून येणारे ७७ ड्रोन पाडले आहेत. ७ मे या दिवशी भारताने पाकिस्तानवर केलेल्या क्षेपणास्त्र आक्रमणात एकूण ३३ जण ठार आणि ७६ जण घायाळ झाले, असा दावाही अहमद शरीफ यांनी केला. (उघड उघड खोटे बोलणारा पाकिस्तान ! अशा देशावर कधीतरी विश्वास ठेवला जाऊ शकतो का ? – संपादक)
(म्हणे) ‘भारताने आमच्या प्रत्युत्तराची वाट पहावी !’ – पाक सैन्य
लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, भारताने काही काळापूर्वी त्याच्या लढाऊ विमानांमधून हवेतून भूमीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे डागली. आम्हाला केवळ एवढेच सांगायचे आहे की, आम्ही भारताच्या शक्तीला, युक्त्यांना किंवा आक्रमणांना घाबरणारा समुदाय नाही. आता त्यांनी आमच्या उत्तराची वाट पाहावी.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकला दिले २० सहस्र कोटी रुपयांचे कर्ज
पाकिस्तान भारतावर आक्रमण करत असतांना अशा प्रकारचे कर्ज संमत करणारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी भारतविरोधी आहे, हे स्पष्ट होते !
पाककडून भारतावर आक्रमण केले जात असतांनाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानसाठी २० सहस्र कोटी रुपयांचे २ कर्ज संमत केले आहेत. या कर्जापैकी एक कर्ज ‘एक्सटेंडेड फंड फॅसिलिटी’अंतर्गत तात्काळ दिले जाईल तर दुसरे कर्ज पुढील २८ मासांत दिले जाईल.
(म्हणे) ‘भारताचा डाव उधळून लावला !’- पंतप्रधान शाहबाज शरीफ

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेल्या कर्जाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले की, भारत हे कर्ज पाकला मिळू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होता; पण आम्ही त्याचा डाव उधळून लावला. तसेच नाणेनिधीनेही भारताचा खोटा प्रचार फेटाळून लावला आहे. आता नाणेनिधी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला स्थिर आणि सुधारण्यास साहाय्य करील.
भारत-पाक यांनी संघर्ष वाढवणे टाळावे ! – चीनचे आवाहन

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान भारत आणि पाक यांच्यातील युद्धस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हणाले की, चीन भारत आणि पाक यांच्यातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. २ अण्वस्त्रधारी देशांमधील तणाव थांबवणे आवश्यक आहे.
भारत आणि पाक यांनी संयम बाळगावा ! – ‘जी-७’ देश
भारत आणि पाक यांनी संयम बाळगावा, असे आवाहन कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन या जी-७ गटाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केले आहे. ते म्हणाले की, पहलगाम येथे झालेल्या भयंकर आतंकवादी आक्रणाचा आम्ही तीव्र निषेध करतो; परंतु सैनिकी तणाव आणखी वाढल्याने या प्रदेशाच्या स्थिरतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी तात्काळ तणाव अल्प करावा आणि थेट चर्चेद्वारे शांततापूर्ण तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आम्ही जलद आणि कायमस्वरूपी राजनैतिक तोडग्यासाठी आमचा पाठिंबा पुन्हा व्यक्त करतो.
भारताच्या आक्रमणात ठार झालेल्या काही आतंकवाद्यांची नावे उघड
भारताने ७ मेच्या रात्री पाकमधील आतंकवाद्यांच्या ९ तळांवर केलेल्या आक्रमणात ठार झालेल्या आतंकवाद्यांची नावे आता उघड झाली आहेत. यात जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर व्यतिरिक्त लष्कर-ए-तोयबाचा कमांडर अबू जुंदाल आणि जैशचा हाफिज महंमद जमील यांचा समावेश आहे. त्याखेरीज मुदस्सर खादियान खास, महंमद युसूफ अझहर, खालिद (अबू आकाशा) आणि महंमद हसन खान यांचा समावेश आहे.
कोणतेही आतंकवादी आक्रमण युद्ध मानले जाणार ! – भारताचा निर्णय
भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने निर्णय घेतला आहे की, भविष्यात होणारे कोणतेही आतंकवादी कृत्य भारताविरुद्ध युद्ध मानले जाईल आणि त्यानुसार त्याला प्रत्युत्तर दिले जाईल.
संपादकीय भूमिकापाक प्रतिदिन भारतावर आक्रमण करतो आणि नंतर भारत त्याचे आक्रमण परतवून लावत त्याच्यावर आक्रमण करतो. पाकच्या आक्रमणांची वाट पहात आणि ती परतवून लावत बसण्यापेक्षा आता भारताने गांधीगिरी सोडून पाकवर स्वतःहून थेट आक्रमण करून त्यांची सर्व सैनिकी शक्ती नष्ट करणे आवश्यक आहे ! यानंतरच पाकमधील आंतकवादी कारखाने नष्ट होऊन भारत आतंकवाद मुक्त होईल आणि हिंदू सुरक्षित होतील ! |