मंदिर विश्वस्तांनी मंदिर परिसराचे पावित्र्य जपावे ! – गोमंतक मंदिर महासंघ

फोंडा, २७ जून – मंदिर विश्वस्तांनी ‘सर्मधर्मसमभावा’च्या गोंडस नावाखाली मंदिर परिसराचे पावित्र्य नष्ट करू नये, असे आवाहन ‘गोमंतक मंदिर महासंघा’ने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

शिरोडा, फोंडा येथील श्री कामाक्षी मंदिराच्या पवित्र तळीमध्ये ख्रिस्ती बांधवांनी ‘सांजाव’ साजरा केला. मंदिराच्या प्रथेनुसार हा ‘सांजाव’ साजरा केल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे सचिव श्री. जयेश थळी म्हणाले, ‘‘मंदिराचे तळे हे तीर्थरूपी असते आणि हे तळे केवळ मंदिराच्या उत्सवाच्या वेळी वापरले जाते. दारू पिऊन तळ्यात ‘सांजाव’ साजरा केल्याने तळे अपवित्र झाले आहे. ही एक संतापजनक आणि दुर्दैवी गोष्ट आहे. पोर्तुगीज राजवटीत आपल्या पूर्वजांनी प्राण पणाला लावून आपल्या मंदिरांचे पावित्र्य राखले; मात्र आज धार्मिक सलोख्याच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धा पायदळी तुडवल्या जात आहेत. इतर धर्मियांच्या पवित्र स्थळी असा स्वैराचार करण्याची अनुमती कुणी देणार का ? या गंभीर चुकीबद्दल दोषींनी तात्काळ क्षमा मागावी आणि मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी कडक पावले उचलावीत.’’