सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रति भाव असलेले ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे वर्धा येथील कै. विजय डगवार !

१४.६.२०२१ या दिवशी वर्धा येथील विजय डगवार यांचे निधन झाले. १० जून २०२४ या दिवशी त्यांचे तिथीनुसार तृतीय वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कै. विजय डगवार

१. स्वावलंबी

‘माझे यजमान स्वतःची सर्व कामे स्वतः करत असत, उदा. दवाखान्यात जाणे, औषध घेणे, कपड्यांच्या घड्या करणे, अंथरूण-पांघरूण आवरणे, डोळ्यांमध्ये औषध घालणे इत्यादी.

२. उत्तम स्मरणशक्ती

बाहेरगावी गेल्यावर ‘कोणते साहित्य कुठे ठेवले आहे ? कोणता कागद कोणत्या डायरीत आहे ?’, हे त्यांना सर्व ठाऊक असे. त्याप्रमाणे ते सांगत असत.

पू. (श्रीमती) मंदाकिनी डगवार

३. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधनेला आरंभ

सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर नामाचे महत्त्व कळल्यावर त्यांनी नामजपाला प्रारंभ केला. वर्धा येथे सर्वप्रथम झालेल्या गुरुपौर्णिमेला यजमानांनी अर्पण दिले होते. आम्हाला आमची कुलदेवता ठाऊक नव्हती. ‘कुलदेवता कळावी’, यासाठी आम्ही गावाकडील जुन्या लोकांना कुलदेवतेचे नाव विचारले. भाटाने आमच्या कुलदेवतेचे नाव सांगितल्यावर यजमानांना पुष्कळ आनंद झाला. त्यांनी भाटाला अमितची (मुलाची) सायकल भेट दिली.

कु. मयुरी डगवार

४. बाहेरगावाहून प्रसारातील साधक किंवा संत आल्यावर त्यांची सेवा मनापासून करणे

बाहेरगावाहून प्रसारातील साधक किंवा संत आल्यावर यजमान त्यांची सेवा मनापासून करत. ‘खोलीची स्वच्छता करणे; भाजीपाला, फळे, तसेच त्यांना आवडणारे पदार्थ आणून देणे’ इत्यादी सेवा ते परिपूर्ण आणि भावपूर्ण करत. बाहेरगावाहून संत किंवा साधक आल्यावर ते त्यांना घ्यायला आणि सोडायला रेल्वेस्थानकावर जात असत.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राच्या अनुभूतीमुळे ‘ते साक्षात् भगवान श्रीकृष्ण आहेत’, याची त्यांना जाणीव होणे

त्यांनी गोकुळाष्टमीला देवघरातील श्रीकृष्णाला गुलाल वाहिल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रावर आपोआप गुलाल पडला. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर साक्षात् भगवान श्रीकृष्ण आहेत’, याची त्यांना जाणीव झाली.

६. त्यांच्याकडे ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे बांधण्याची सेवा होती. सेवा करण्यासाठी ते वेळेत जात असत.

७. इतरांचा विचार करणे

‘सर्वांची साधना चांगली व्हावी’, यासाठी ते भ्रमणभाषवर अल्प बोलत असत. भ्रमणभाष करण्यापूर्वी ते बोलण्याची वेळ विचारून घेत असत.

८. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

दळणवळण बंदीच्या कालावधीमध्ये ते नित्यनेमाने व्यष्टी साधनेचा आढावा देत असत. ‘मंत्र म्हणणे, स्वयंसूचनांची सत्रे करणे, स्तोत्र म्हणणे आणि नामजप करणे’ इत्यादी गोष्टी ते नियमित करत असत. चुका झाल्यास ते क्षमायाचना करत असत आणि चुकांसाठी प्रायश्चित्त घेऊन त्या पूर्ण करत असत.

९. कुटुंबियांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य करणे

त्यांनी अमित आणि मयुरी यांना साधनेत सर्वतोपरी साहाय्य केले. सर्व व्यवहार ते स्वतः करत असत. ‘मुलीला आणि मला त्रास होऊ नये’, असा विचार करून ते आम्हाला साहाय्य करत असत.

१०. ते मित्रमंडळी आणि नातेवाईक यांना नामजपादी उपायांचे महत्त्व सांगत असत.

११. क्षमायाचना करणे

रामनाथी आश्रमात जाऊन आल्यापासून ते आमची क्षमायाचना करायचे. (पूर्वी यजमानांचा आमच्या साधनेला विरोध होता.) ते गुरुदेव, संत, अमित आणि मयुरी यांची, तसेच माझी पुष्कळ वेळा क्षमा मागायचे. ‘माझ्या बोलण्यामुळे तुम्ही दुखावले गेल्याविषयी मला क्षमा करा’, असे ते म्हणत.

श्री. अमित डगवार 

१२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव

१२ अ. वर्धा येथील रहात्या घरी प्रत्येक खोलीतील परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्राला ते नमस्कार करत असत.

१२ आ. रामनाथी आश्रमात गेल्यावर ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन, म्हणजे देवाचे दर्शन’, असा भाव असे.

१२ इ. आश्रमातून निघतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पाहिल्यावर ते विष्णूच्या विराट रूपात दिसणे आणि बराच वेळ भावजागृती होणे : काही वर्षांपूर्वी मयुरीला भेटायला आम्ही रामनाथी आश्रमात गेलो होतो. आश्रमातून प्रस्थान करतांना आमच्या समवेत सद्गुरु (कु.) स्वातीताई (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये) होत्या. त्यांना निरोप द्यायला परात्पर गुरु डॉक्टर आगाशीत आले. यजमानांनी परात्पर गुरु डॉक्टरांना पाहिल्यावर त्यांना ते विष्णूच्या विराट रूपात दिसले. आश्रमातून निघाल्यापासून आगगाडीत बसेपर्यंत त्यांच्या डोळ्यांतून सतत भावाश्रू वहात होते.

१३. जाणवलेला पालट

पूर्वी ‘मुलांनी लग्न करावे’, असा त्यांचा अट्टहास होता. आता ‘सर्वकाही ईश्वरेच्छेने होईल. आपली इच्छा नको’, असे त्यांना वाटत होते.

१४. अनुभूती

त्र्यंबकेश्वरच्या  कुंडात अंघोळ करतांना यजमान त्यात बुडणे, एका धिप्पाड व्यक्तीने त्यांचे केस धरून त्यांना बाहेर काढणे आणि त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला जीवनदान दिले’, असे त्यांनी सांगणे : सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करू लागल्यावर यजमानांना पूर्वजांच्या त्रासाविषयी कळले. तेव्हा त्यांनी नाशिक येथे जाऊन ‘नारायण नागबळी’ हा विधी केला. नाशिक येथील त्र्यंबकेश्वरच्या कुंडात अंघोळ करतांना यजमान कुंडात बुडत होते. तेव्हा एका धिप्पाड व्यक्तीने यजमानांचे केस धरून त्यांना बाहेर काढले. त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टर आले आणि त्यांनी मला जीवनदान दिले’, असे ते म्हणाले. तेव्हापासून त्यांनी प्रतिदिन ‘भीमरूपी महारुद्रा…’ हे मारुतिस्तोत्र म्हणायला प्रारंभ केला.

१५. गुरुस्मरण आणि नामजप करत असतांनाच देहावसान होणे

रुग्णाईत असतांना ते सतत ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’, असा धावा करत होते. त्यांचा ‘निर्गुण’ हा नामजप सतत चालू होता. अखंड गुरुस्मरण आणि नामजप करत असतांनाच त्यांचे देहावसान झाले. ही केवळ आणि केवळ गुरुकृपाच आहे.

१६. कृतज्ञता

‘साधना केल्यावर भगवंत नराचा नारायण करतो आणि दगडाला मूर्तीचा आकार देतो’, हे मला अनुभवता आले. त्यांची केवढी कृपा ! आपण केवळ नाममात्र आहोत. त्यांच्या हातातील बाहुले आहोत.

‘गुरुदेवांनी या साधनाप्रवासात त्यांना फुलासारखे सांभाळले. त्यांना कोणतीही झळ पोचू दिली नाही आणि चरणी लीन करून घेतले’, याविषयी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– (पू.) श्रीमती मंदाकिनी विजय डगवार (पत्नी), वर्धा (२१.६.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक