रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील चैतन्यामुळे कु. सिद्धि गांवस यांना स्वतःत जाणवलेले पालट !

‘पू. संदीप आळशी (सनातनचे ११ वे संत, वय ४९ वर्षे) यांनी ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील चैतन्यामुळे माझ्यात पालट होत आहेत’, असे मला सांगितले होते. त्यांच्या बोलण्यातील सत्यतेची प्रचीती आता मला येत आहे. मला स्वतःमध्ये जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

कु. सिद्धी गावस

१. सकारात्मकता आणि श्रद्धा वाढणे

मला आध्यात्मिक त्रास आहे. त्यामुळे मी सतत नकारात्मक विचारांत असायचे; पण आता ‘गुरुदेव साक्षात् श्रीविष्णु आहेत. त्यामुळे माझ्या केसालाही धक्का लागणार नाही’, अशी माझी दृढ श्रद्धा असल्याने मला कधीही त्रास जाणवायला लागला, तरी तो लगेच न्यून होतो.

२. आनंद आणि उत्साह यांत वाढ होणे

अ. पूर्वीच्या तुलनेत आता मला पुष्कळ आनंद मिळू लागला आहे.

आ. मी पहाटे ५ वाजता उठून नामजपादी उपाय करण्याचा प्रयत्न करते. मला दुपारी विश्रांती घेण्याची आवश्यकता वाटत नाही. सेवा करतांना मला उत्साह वाटतो.

३. सेवेची तळमळ वाढणे

अ. मी वयस्कर साधिकांच्या समवेत रुग्णालयात गेल्यावर तिथे अध्यात्मप्रसाराची सेवा करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा ‘भगवंतच माझा आत्मविश्वास वाढवत आहे’, असे मला जाणवते.

आ. मी बालीशपणे वागत असे. ‘माझ्यामध्ये सूज्ञता यावी’, यासाठी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, उत्तरदायी साधक आणि सहसाधक यांच्याप्रमाणे भाव ठेवण्याचा मी प्रयत्न करते. त्यामुळे माझे ‘मी परिपूर्ण सेवा कशी करू शकते ?’, याविषयी चिंतन चालू झाले.

इ. कधी कधी सेवा करतांना मला काहीही सुचत नाही. तेव्हा ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ माझ्याकडे पाहून स्मित हास्य करत आहेत’, असे मला वाटते आणि मी परत सेवा चालू केल्यावर थोड्या वेळाने मला बरे वाटते.

ई. आता माझी सेवेची घडी बसायला लागली आहे.

उ. माझे ‘अनावश्यक भ्रमणभाष हाताळणे, अनावश्यक कारण सांगून सेवेतून सुटी घेणे’ इत्यादी उणावले आहे. ‘कोणत्याही नातेवाइकाच्या लग्नाला किंवा कार्यक्रमाला जाण्यापेक्षा सेवेला प्राधान्य देऊया’, असे मला वाटते.

४. व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांत वाढ होणे

४ अ. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न वाढणे

१. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया मनापासून राबवावी’, असे मला वाटते.

२. पूर्वी कोणतीही समस्या आली, तर मी पुष्कळ अस्थिर व्हायचे. आता समस्या आल्यावर ‘मी कुठेतरी चुकत आहे किंवा परिपूर्ण होण्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत’, असे वाटून त्या समस्येप्रतीही मला कृतज्ञता वाटते.

४ आ. भावजागृतीचे प्रयत्न वाढणे

१. जेव्हा नामजप करतांना माझ्या मनात अनावश्यक विचार येतात किंवा भाव टिकून रहात नाही, तेव्हा मी भावजागृतीसाठी वेगवेगळे प्रयत्न करते.

२. ‘साक्षात् श्रीविष्णु (परात्पर गुरु डॉ. आठवले) आणि श्री लक्ष्मी (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) मला गुरुरूपात मिळाले आहेत. त्यामुळे त्यांचे मन जिंकणे हेच माझे जीवनाचे ध्येय आहे’, असे वाटून माझा साधना अन् सेवा यांकडील कल वाढला आहे.

५. कौतुक झाल्यावर साधनेचे प्रयत्न वाढवायचे असल्याची जाणीव होणे

काही दिवसांपूर्वी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प.पू. गुरुदेवांची माझे कौतुक करणारी चौकट प्रसिद्ध झाली होती. ती चौकट वाचून मला ‘मी वर्तमानकाळात असले पाहिजे आणि साधनेचे प्रयत्न वाढवायला हवेत’, याची जाणीव झाली.’

– कु. सिद्धि गांवस, पर्वरी, गोवा. (२८.१०.२०२३)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक