नाशिक येथे शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेकडून निवडणुकीचा अर्ज भरला !

शांतिगिरी महाराज व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक –  येथे शांतीगिरी महाराजांनी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला आहे. त्यांनी अर्ज भरतांना पक्षाच्या नावापुढे शिवसेनेचा उल्लेख केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

बाबाजी भक्त परिवारात सगळ्या पक्षांची मंडळी आहेत. आमच्या लोकसभेच्या कमिटीने उमेदवारीचा निर्णय घेतला आहे. ‘भक्तपरिवार आणि जनता जनार्दन यांच्या वतीने मी निवडणूक लढवतोय’, असे शांतीगिरी महाराज म्हणाले. शिवसेनेनं ‘एबी फॉर्म’ दिलेला नसतांनाही तुम्ही त्यांच्याकडून अर्ज कसा भरला ? असाही प्रश्न शांतीगिरी महाराजांना विचारण्यात आला. त्यावर ‘‘शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाण आहे. प्रभु श्रीरामाच्या हाती धनुष्यबाण असतो. प्रभु श्रीरामांची इच्छा असेल, तर ते सर्वकाही व्यवस्थित करतील’’, असे शांतीगिरी महाराज म्हणाले. मुंबईत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नाशिकमध्ये शांतीगिरी महाराज यांनी सेनेकडून अर्ज भरल्याविषयी विचारण्यात आल्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणे टाळले.