‘भारताने गोमंतकियांवर बलपूर्वक राज्यघटना लादली !’ – विरियातो फर्नांडिस, काँग्रेस

काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांचे राष्ट्रघातकी विधान !

पणजी – काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी एका प्रचारसभेत बोलतांना भारताने राज्यघटना गोमंतकियांवर बलपूर्वक लादली असल्याचे वक्तव्य केले आहे. असे विधान तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोरही केले होते, असे ते म्हणाले. (असे असतांनाही काँग्रेसच्या नेत्यांनी विरियातो फर्नांडिस यांना काँग्रेसची उमेदवारी दिली, म्हणजेच काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांचीही हीच भूमिका आहे, असे समजावे लागेल ! – संपादक)

सौजन्य Republic World

१. या प्रचारसभेत बोलतांना फर्नांडिस पुढे म्हणाले की, गोमंतकीय जनतेसाठी दुहेरी नागरिकत्वाची मागणी मी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली होती. (फर्नांडिस यांच्यासारख्या पोर्तुगिजधार्जिण्या लोकांना अजूनही गोवा पोर्तुगीज वसाहत वाटते. त्यामुळे हे लोक दुहेरी नागरिकत्वाची मागणी करतात. हे लोक राष्ट्रीय एकात्मतेसाठी घातक आहेत. याविषयी सूज्ञ गोमंतकीय जनता नक्कीच विचार करील ! – संपादक)  

२. भारताने राज्यघटना गोमंतकियांच्या डोक्यावर लादली, असे वक्तव्य करणारे विरियातो फर्नांडिस हे भारतीय नौदलाचे अधिकारी होते. (अशा विचारसरणीची व्यक्ती भारतीय नौदल सेवेत कार्यरत असतांना कशी वागली असेल ? हे तपासून पाहिल्यास योग्य ठरेल ! – संपादक)

काँग्रेसपासून लोकशाहीला धोका ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

डॉ. प्रमोद सावंत

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फर्नांडिस यांच्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, काँग्रेसच्या उमेदवाराने भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करण्याचे धाडस केले आहे. काँग्रेसने हे ‘भारत तोडो’ राजकारण थांबवावे. काँग्रेसपासून भारतीय लोकशाहीला धोका आहे.

संपादकीय भूमिका 

भारत स्वतंत्र झाल्यानंतर केंद्रात सत्तेत आलेल्या काँग्रेसच्या अशा राष्ट्रविघातक विचारसरणीमुळेच तिने गोवा मुक्त करण्यास टाळाटाळ केली होती, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. काँग्रेसची ही पोर्तुगीजधार्जिणी आणि देशद्रोही वृत्ती गोमंतकियांच्या लक्षात आली होती आणि म्हणूनच गोव्याच्या मुक्तीनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत गोमंतकियांनी काँग्रेसला नाकारले होते !