स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे पिंपळखुटे (जिल्हा पुणे) येथील श्री. अविनाश तानाजी गराडे यांना स्वतःत जाणवलेले पालट !

‘फेब्रुवारी २०२३ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमात शिबिर झाले. त्यात सहभागी झाल्यावर माझ्यात झालेले आमूलाग्र पालट येथे दिले आहेत.

१. साधनेत येण्यापूर्वी असलेले स्वभावदोष

‘साधनेमध्ये येण्यापूर्वी मी (श्री. अविनाश तानाजी गराडे) व्यसनाधीन होतो. इतरांना उलट बोलणे, अरेरावी करणे, मद्य पिणे, चिडचिडेपणा अशा सर्व स्वभावदोषांनी मी ग्रस्त होतो. ‘पैसा मिळवणे’, हेच माझे ध्येय होते.

२. साधनेत आल्यावर झालेले पालट

साधनेमध्ये आल्यावर माझ्यामध्ये गुरुकृपेने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने) पालट झाले. मला लागलेली व्यसने पूर्णपणे बंद झाली. ‘नामजप केल्यामुळे माझ्यात देवाप्रती प्रेमभाव आणि भक्तीभाव वाढत आहे’, असे मला वाटते. पूर्वी माझ्या स्वभावात अहंभावाचे प्रमाण पुष्कळ होते; परंतु आता साधना केल्यामुळे अहंभाव न्यून होत आहे. आता ‘हिंदु राष्ट्राच्या कार्यासाठी सतत सक्रीय असणे’, हेच माझ्या जीवनाचे ध्येय झाले आहे.

३. स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे झालेला लाभ

धर्मशिक्षणवर्गात शिकवलेल्या स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेचा मला लाभ झाला. त्यामुळे समष्टी सेवेत येणार्‍या अडचणी प.पू. गुरुमाऊली तुमच्या कृपेने दूर होत आहेत, उदा. पूर्वी प्रसारसेवेत मीपणा, संकुचितपणा, ‘मी का बोलू आणि सांगू ?’ ही वृत्ती माझी अडवणूक करत असे; पण अहं-निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे हे अडथळे दूर होत आहेत.

‘प.पू. गुरुमाऊली, तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. अविनाश तानाजी गराडे, पिंपळखुटे, तळेगाव, पुणे. (१९.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक