Samajwadi Party Muslims Appeasement : आतंकवादी कारवायांतील आरोपींविषयी अबू आझमी यांना पुळका !

महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन २०२३

‘वॉरंट’ न देता अटक झाली; म्हणून विधानसभेत केली आरडाओरड !

अबू आझमी, समाजवादी पक्षाचे आमदार

नागपूर, ११ डिसेंबर (वार्ता.) : राष्ट्रविघातक कारवायांमध्ये गुंतत असलेल्या मुसलमान युवकांचे प्रबोधन करण्याऐवजी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी  अशा आरोपींना ‘वॉरंट’ न देता अटक झाली; म्हणून ११ डिसेंबर या दिवशी विधानसभेत आरडाओरड केली. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय्.ए.) आणि आतंकवादविरोधी पथक (ए.टी.एस्.) यांनी ९ डिसेंबर या दिवशी भिवंडी (ठाणे) येथे धाड घालून आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी काही मुसलमानांना अटक केली. ही कारवाई ‘अटक वॉरंट’ न देता झाल्याचा विषय अबू आझमी यांनी सभागृहात माहितीच्या सूत्राखाली (‘पॉईंट ऑफ इनफॉर्मेशन’) उपस्थित केला.

 (सौजन्य : ABP MAJHA)

आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांवर कारवाई व्हायला हवी; मात्र कारवाई करतांना कोणत्याही प्रकारे समन्स किंवा अटक वॉरंट देण्यात आलेले नाही.  कारवाई करतांना पोलिसांनी घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले. अटक करतांना कुटुंबियांना माहिती देण्यात आली नसल्याविषयीचा पुळका अबू आझमी यांनी सभागृहात व्यक्त केला. अबू आझमी यांच्या या वक्तव्याला सत्ताधारी पक्षाकडून तीव्र विरोध दर्शवला. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी अबू आझमी यांच्या वक्तव्याला विरोध दर्शवला.

संपूर्ण राज्यात कारवाया होत आहेत ! – आमदार महेश लांडगे, भाजप

‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा आणि आतंकवादविरोधी पथक यांनी राज्यात सर्वाधिक कारवाया पुणे येथे केल्या आहेत. जुलै मासात पुणे येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सार्वजनिक सभेच्या १ मास आधी अन्वेषण यंत्रणेला अतिरेकी कारवायांची माहिती मिळाली. या वेळी अन्वेषण यंत्रणेने कारवाई केली. कोंढाणा येथील एका मशिदीवर धाड टाकून अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी असल्यावरून एका भूलतज्ञ डॉक्टरला अटक करण्यात आली. अतिरेक्यांच्या विरोधातील कारवाई केवळ मुंबईमध्ये नव्हे, तर संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी अशा कारवाया करण्यात येत आहेत’, असे आमदार महेश लांडगे यांनी म्हटले.

यावर अबू आझमी यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे बोलण्याची मागणी केली. या वेळी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी अबू आझमी यांनी आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी मुसलमानांविषयी आवाज उठवण्याऐवजी देशभक्त मुसलमानांचा प्रश्न सभागृहात उपस्थित केला.