इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर या दिवशी झालेले आक्रमण, हे आतंकवादी कृत्य ! – भारत

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

रोम – इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबर या दिवशी झालेले आक्रमण, हे आतंकवादी कृत्य होते, असे मत भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी इटलीमध्ये झालेल्या संयुक्त सचिवांच्या सत्रात बोलतांना व्यक्त केले. इस्रायल-हमास युद्धाविषयी बोलतांना जयशंकर म्हणाले की, ७ ऑक्टोबरनंतरही सातत्याने आतंकवादी आक्रमणे होत आहेत. आतंकवाद खपवून घेतला जाऊ शकत नाही. आपण सर्वांनी त्याविरोधात उभे रहाण्याची आवश्यकता आहे.

जयशंकर पुढे म्हणाले,

१. द्विराष्ट्र, म्हणजे एक इस्रायल आणि दुसरे पॅलेस्टाईन हाच या समस्येवरील एकमेव उपाय आहे.

२. पॅलेस्टाईनच्या जनतेने या समस्येवर तोडगा काढणे आवश्यक आहे.

३. कोणताही प्रश्‍न हा संवाद आणि सामंजस करार, यांद्वारे सोडवला जाऊ शकतो.

४. युद्ध आणि आतंकवाद यांनी काहीही साध्य होणार नाही.

५. सध्याच्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या मानवतावादी कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे.