५ लाख मंदिरांची मुक्‍ती, तसेच लव्‍ह जिहादचा बिमोड यांसाठी हिंदूंची एकगठ्ठा मते आवश्‍यक ! – पू. कालिचरण महाराज

पू. कालिचरण महाराज

नाशिक – देशात हिंदू एकत्रित नसल्‍याने त्‍यांची ताकद दिसत नसून त्‍यांना विविध समस्‍यांना सामोरे जावे लागते. लव्‍ह जिहाद, आतंकवादासह हिंदुविरोधी बोलणार्‍यांची तोंडे बंद करण्‍यासाठी, तसेच ५ लाख मंदिरांना मुक्‍त करण्‍यासाठी देशात हिंदूंची एकगठ्ठा मते आवश्‍यक आहेत. ती सिद्ध करणे, तसेच राजकारणाचे हिंदुत्‍वकरण करणे हा उद्देश आहे. त्‍या दृष्‍टीने काम चालू आहे, असे स्‍पष्‍ट मत पू. कालिचरण महाराज यांनी एका दैनिकाला दिलेल्‍या मुलाखतीत व्‍यक्‍त केले. ते नाशिक येथे एका कार्यक्रमासाठी आले होते.

हिंदूंची एकगठ्ठा मते सिद्ध केल्‍यावर हिंदूंचे प्रश्‍न सुटतील !

पू. कालिचरण महाराज म्‍हणाले, ‘‘अयोध्‍या तो झाँकी है, मथुरा काशी तो अभी बाकी है ।’ ही घोषणा पहिल्‍यापासूनच आहे; मात्र देशातील तब्‍बल ५ लाख मंदिरे आपल्‍याला मुक्‍त करायची आहेत. यासाठी हिंदूंची एकगठ्ठा मते सिद्ध करणे आवश्‍यक आहे, तरच संपूर्ण देशात गोवंशियाचा कायदा लागू होऊ शकतो. लव्‍ह जिहाद आणि आतंकवादही संपू शकतो; मात्र यासाठी सर्व हिंदूंनी जातीयवाद तोडून एकगठ्ठा मतांसाठी संघटित होण्‍याची आवश्‍यकता आहे. समान नागरी कायदा, सीएए, युसीसी, एन्.आर्.सी. कायदे देशात लवकर लागू होणे आवश्‍यक आहे. मी हिंदूंना आवाहन करतो की, हे कायदे संसदेत संमतीला आल्‍यास सावधान रहाण्‍याची आवश्‍यकता आहे.’’

ते म्‍हणाले, ‘‘लव्‍ह जिहाद’ हा देशाचा राजाच रोखू शकतो. यासाठी देशातील सर्वोच्‍च स्‍थानी कट्टर हिंदुत्‍वनिष्‍ठ राजाला बसवण्‍याची आवश्‍यकता आहे. आमदार आणि खासदार यांच्‍यातूनच राजा निवडला जातो. देशातील सर्व आमदार, खासदार आणि राज्‍यसभा सदस्‍य हेच कायदे बनवतात. हिंदूंचे संवर्धन, संरक्षण होण्‍यासाठी, तसेच देशात पुन्‍हा सोन्‍याचा धूर काढायचा असेल, तर हिंदुत्‍वनिष्‍ठ राजा सर्वोच्‍चस्‍थानी बसवणे हे आपले आद्य कर्तव्‍य आहे.’’

पू. कालिचरण महाराज पुढे म्‍हणाले, ‘‘हिंदु धर्माचा अवमान करणारे फोफावणारच, कारण त्‍यांच्‍या डोक्‍यावर अन्‍य धर्मियांच्‍या मतांचा हात आहे. हिंदु एकगठ्ठा मते सिद्ध झाल्‍यावर स्‍टॅलिनसारख्‍या हिंदुद्वेष्‍ट्यांची बडबड बंद होईल. मारामारीची आवश्‍यकता नाही. हिंदूंनी मतदानावेळी एकच बटण दाबल्‍यास हिंदुविरोधी लोकांची तोंडे बंद होतील.’’